आरिफ शेख
गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचं कारण तिथं दुष्काळ आणि विजेची टंचाई हे आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, जलसंकट दूर केले नाही, तर लोकांना स्थलांतर करावे लागेल.
इराणमध्ये कच्चे तेल भरपूर आहे. त्यांची अर्थव्यवस्था या तेलावर अवलंबून असली, तरी तिथं सध्या जी समस्या आहे, ती वेगळीच आहे. तेल भरपूर; परंतु प्यायला पाणी नाही, अशी सध्याची तेथील स्थिती आहे. इराणमध्ये पाण्यावरून अनागोंदी आहे. दीर्घकाळ दुष्काळाचा सामना करावा लागला, तर तिथलं उरमिया सरोवर शुष्क पडू शकते.
इराणला सध्या तीव्र पाणीटंचाई आणि खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. वीज आणि पाण्यासाठी सामान्य लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. देशातील गंभीर जलसंकटाकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. तज्ज्ञांनी अनेक वर्षांपासून बिघडत चाललेल्या पाण्याच्या परिस्थितीकडं लक्ष वेधलं होतं.
इराणच्या हवामान विभागानं एप्रिलमध्येच अभूतपूर्व दुष्काळ पडेल, असा इशारा दिला होता. तिथं पावसामध्ये लक्षणीय घट झाली आहे. सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. खुझेस्तान या तेल उत्पादक प्रांतात लोक पाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आणि इतर शहरांमध्ये विजेच्या टंचाईच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली.
सरकारनं सर्वाधिक प्रभावित भागात आपत्कालीन मदत दिली; परंतु त्यावर लोक समाधानी नाहीत. वाढती उष्णता, प्रदूषण, पूर आणि तलाव कोरडे पडणे यासह इराणला सध्या विविध पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2020 ते जुलै 2021 दरम्यान गेल्या वर्षीच्या याच कालावधीत झालेल्या पावसापेक्षा अतिशय कमी पाऊस पडला. अमेरिकेतील संशोधकांनी उपग्रहाद्वारे डेटा संकलित केला आहे.
या आकडेवारीनुसार, मार्चमधील पावसाची तुलना गत चाळीस वर्षांच्या सरासरीशी केली गेली आहे. “युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आर्विन्स सेंटर फॉर हायड्रो मेटेरॉलॉजी’च्या मते, यावर्षी पहिल्या तीन वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांत पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.
इराणमध्ये 1983 नंतर जानेवारी हा सर्वांत कोरडा महिना राहिला आहे. मार्चदेखील सर्वांत निरंक होता. गेल्या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये थोडा पाऊस झाला. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने असा अंदाज लावला आहे की, इराणमध्ये 35 टक्के पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. पाऊस नसल्याने तिथं अन्नधान्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो.
स्टटगार्ट विद्यापीठाच्या संशोधकांच्या आकडेवारीनुसार, ज्या भागात पूर्वी भरपूर पाणी होते, त्या भागात आता पावसाचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. करून नदी आता कोरडी आहे. हवामान बदलामुळे पाण्याची पातळी गेल्या काही वर्षांत झपाट्याने खाली आली आहे. खुझेस्तान प्राधिकरणातील स्रोतांकडून मिळालेले नकाशे जुलै 2021 पर्यंत या प्रदेशातील धरणांच्या पाण्याची पातळी दर्शवतात. अनेक महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणी अजूनही खूपच कमी आहे आणि सतत पाणी सोडण्याची मागणी जनतेतून होत आहे. धान उत्पादक आणि पशुपालकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं आहे.
काही लोक स्थानिक पर्यावरणीय संकटास तेल उद्योगाला जबाबदार धरतात. खुझेस्तान या भागांमधून पाणी देशाच्या मध्यभागी असलेल्या वाळवंटी भागातदेखील नेलं जातं. त्यामुळेही तणाव वाढला आहे. ही समस्या अनेक दशकांपासून आहे. खराब व्यवस्थापन, खराब पर्यावरण व्यवस्था, दूरदृष्टीचा अभाव आणि या परिस्थितीसाठी पूर्वतयारी न करणे यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
इराण आता सतत दुष्काळाचा सामना करीत आहे आणि हवामान बदलामुळे अधिक भयानक परिस्थितीला सामोरं जात आहे. अति उष्णता आणि कोरड्या हवामानाचा जलविद्युत निर्मितीवर अधिक परिणाम होत असून त्यामुळे इराणमध्ये विजेची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. राजधानी तेहरानसह इतर शहरांमध्ये विजेच्या टंचाईविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. विजेच्या कमतरतेमुळे दूरसंचार सेवा कोलमडली आहे. शिवाय पथदिवेही बंद झाल्याने इराणला अंधाराचा सामाना करावा लागत आहे.
उन्हाळ्यात विजेचा वापर वाढला आणि उत्पादन मात्र कमी झाले. त्यामुळे त्याचा परिणाम फीडर बंद पडण्यावर झाला. 2018 ला दुष्काळामुळे नद्या कोरड्या पडल्या होत्या. आता तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणच्या जलसंकटाची कारणे शोधून त्यावर मात केली नाही, तर लाखो लोकांवर स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते.
इराणमध्ये पाच ऑगस्टला हसन रुहानी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी पदभार स्वीकारला. एकीकडे आण्विक कराराचा दबाव, दुसरीकडे इस्रायलबरोबर होणारे प्रॉक्सी वॉर.
शेजारील अरब राष्ट्रांशी वैरभाव, आयात-निर्यातीवर परिणाम या संकटात आता देशांतर्गत वीज-पाणी यासारख्या जीवनावश्यक प्रश्नांची भर पडली आहे. शिवाय त्यातून निर्माण होणारा लोकक्षोभ “आ’ वासून उभा आहे. नूतन राष्ट्रपती या सर्व संकटांचा कसा सामना करतात याकडे इराणी जनतेचे लक्ष लागलेले आहे.