टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू नीरज चोप्रा याने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला आणखी एक पदक मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत.
बुधवारी झालेल्या अ गटातील पात्रता फेरीतील कामगिरीच्या निकषावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे तो ऑटोमॅटिक क्वॉलिफिकेशन नियमांनुसार अंतिम फेरीत दाखल झाला.
पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये 83.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर नोंदवणाऱ्या पहिल्या 12 खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. हे 12 खेळाडू अ आणि ब गटातून एकत्रितरीत्या निवडले जातात. मात्र, नीरजने पात्रतेचा निकष असलेल्या 83.50 मीटरपेक्षा जास्त अंतराची नोंद केल्याने त्याचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.
नीरजने या पात्रता फेरीत तब्बल 86.65 मीटर अंतरावर भाला फेकला. अ गटात नीरज 15 व्या स्थानी होता. मात्र, पहिल्याच प्रयत्नात त्याने ही कामगिरी केली. आता येत्या शनिवारी पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेची अंतिम लढत होणार आहे.