मुंबई – गेल्या ३५ वर्षापासून गांधी परिवारातील एकही व्यक्त सत्तेच्या पदावर नाही. गांधी परिवारातील शेवटचे सत्तापद १९८९ साली संपले. पण तरीही अजून मोदी व भाजपकडून गांधीपरिवार व कॉंग्रेसवर सातत्याने शिव्याशाप सुरू आहेत अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. देशाच्या एकूणच पायाभूत विकासाच्या क्षेत्रात कॉंग्रेस पक्षाने मोठे योगदान दिले आहे. पण याचे श्रेयही मोदी घेत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबई कॉंग्रेसच्या दिवसभराच्या अधिवेशनात व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संबोधित करताना ते बोलत होते.
ते म्हणाले की मुंबईत काँग्रेस मजबूत झाली तरच ती राष्ट्रीय स्तरावर मजबूत होऊ शकते, त्यामुळे शहर युनिटकडे संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे मोठे काम आहे. कॉंग्रेसला मजबूत करणे ही मुंबईतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. मुंबई आणि काँग्रेसचे जुने नाते आहे कारण या पक्षाची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी झाली होती. ते म्हणाले. “जर तुम्ही इतिहास विसरलात, तर भविष्यात तुम्ही काहीही करू शकत नाही.
काँग्रेसने देशासाठी काय केले हे नव्या पिढीला सांगण्याची जबाबदारी आपली आहे. पायाभूत सुविधा, दूरसंचार क्षेत्र यासह देशाच्या प्रगती आणि विकासात पक्षाचा मोठा वाटा आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात मुंबईत झालेल्या विविध प्रकल्पांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.
या प्रगतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची टीका खर्गे यांनी केली. भाजप फक्त काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला शिव्या देऊ शकते. १९८९ पासून या कुटुंबातील एकही सदस्य मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून सत्तेत नाही, असे ते म्हणाले. भारत जोडो न्याय यात्रा लोकांना न्याय देईल आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी चूक होईल, असेही ते म्हणाले.