मुंबई : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर भाजपासहीत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यावर जोरदार टीका केली होती. तसेच वारकरी संप्रदायाकडून देहू संस्थान येथे आंदोलन करुन धीरेंद्र शास्त्रींचा निषेध करण्यात आला होता. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून मी त्यामुळे व्यथित झालो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने मी त्यांचा निषेध करतो. तसेच बेताल वक्तव्यांविरोधात आता कायद्याची गरज आहे. लाखो वारकरी बांधव तुकाराम महाराजांच्या वचनाला आजही मानतो. हे अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री महाराजांवर कारवाई झाली पाहीजे. तसेच आगामी अधिवेशनात हा मुद्दा आम्ही उपस्थित करुन यावर कायदा करण्याची मागणी करणार आहोत, असे त्यांनी म्हटले.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील पक्षकार्यालायत काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी, “महापुरुषांचा अपमान करण्याचे काही जणांचे काम जाणीवपूर्वक चालले आहे. यामध्यमातून महागाई, बेरोजगारी यावरील लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरु आहे. २७ फेब्रुवारीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हा अधिवेशनात हा मुद्दा मांडून यासंबंधी कायदा करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना,”ज्याप्रकारे अंधश्रद्धा व जादूटोना विरोधी कायदा करण्यात आला आहे. तसाच महारापुरुषांच्या विरोधात जे वाचाळवीर बेताल वक्तव्य करुन नवीन समस्या निर्माण करतात. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो. कुणाच्यातरी भावना दुखावल्यामुळे कायदा हातात घेतला जातो, कोण शाई फेकण्याचा प्रयत्न करतो, निषेधासाठी काळे झेंडे दाखविले जातात. हे सर्व थांबविण्यासाठी महापुरुषांचा अपमान होऊ नये, यासाठी काहीतरी कायदा केला पाहीजे.”असे त्यांनी म्हटले आहे .