पुणे – राज्य लोकसेवा आयोगाने बदललेल्या स्वरूपाची अंमलबजावणी २०२५ सालापासून करावी या आग्रही मागणीसह पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आलं असून शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पूर्वी प्रमाणेच होणार आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. पुण्यामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरून जल्लोष करत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील हजेरी लावली होती. आंदोलनस्थळावरून पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द दिला होता.
यानंतर सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली असल्याचे वृत्त हाती आले असून याबाबतची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे.
पडळकरांना खांद्यावर घेऊन जल्लोष
राज्य सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर आमदार पडळकर यांना खांद्यावर घेत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यावेळी पडळकर यांनी, हे सरकार संवेदनशील असल्याने MPSC विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन निर्णय घेतल्याचे सांगितले.
श्रेयवादाचे राजकारण नको, हा विद्यार्थ्यांचा विजय
MPSC विद्यार्थ्यांची मागणी सरकारने मान्य केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला असेल तर हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे. याचे श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असं रोहित पवार यांनी म्हंटलं आहे. सरकारला असा निर्णय घ्यायचाच होता तर विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ येऊच द्यायला नको होती, असेही पवार म्हणाले.
विद्यार्थ्यांसोबत डिजिटल प्रभात
आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांशी डिजिटल प्रभातने संवाद साधत त्यांची बाजू जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी नवा अभ्यासक्रम या वर्षांपासून लागू केल्यास विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची भीती आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.