शर्मिला जगताप
स्त्रीने घराबाहेर पायही काढता कामा नये, असा पारंपरिक निर्बंध झुगारून आनंदीबाई गोपाळराव जोशी या विदेशात जाऊन पहिल्या महिला डॉक्टर बनल्या. त्यांचे महान कार्य कागदावर उमटवले काशीबाई कानिटकर यांनी.
मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबरीकार, निबंधकार काशीबाई कानिटकर या स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. काशीबाईंचा जन्म 20 जानेवारी 1861 रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील आष्टे या गावी झाला. त्यांचे वडील कृष्णराव बापट व्यवसायाने वकील होते. काशीबाई नऊ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न गोविंदराव कानिटकर यांच्याशी झाले.
गोविंदराव हे सुधारक विचारांचे होते. आपल्या पत्नीने शिकावे, असे त्यांना वाटे. त्यांनी काशीबाईंना शिकवलेही. काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा गोविंदरावांनी शिकवल्या.
गोविंदरावांमुळे काशीबाईंचा रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई यांच्याशी स्नेह जुडला आणि काशीबाईंच्या जीवनात आमूलाग्र बदल घडला. रमाबाई रानडे यांनी त्यांना सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास उत्तेजन दिले.
हरि नारायण आपटे, गोविंदराव आणि काशीबाई तिघांनी मिळून निबंधचंद्रिका नावाचे नियतकालिक सुरू केले. काशीबाई यात लिहू लागल्या. त्यांचा पहिला कथासंग्रह म्हणजे “शेवट तर गोड झाला’. “चांदण्यातील गप्पा’, “शिळोप्याच्या गोष्टी’ हे आणखी दोन कथासंग्रह तर, “रंगराव’, “पालखीचा गोंडा’ या दोन कादंबऱ्या काशीबाईंनी लिहिल्या. काशीबाईंनी “मनोरंजन’ या नावाजलेल्या मासिकामध्येही लेखन केले.
भारतातून अमेरिकेस जाऊन एम.डी. होऊन परत आलेल्या पहिल्या स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे 1888 साली पुण्यात निधन झाले. आनंदीबाईंची अमेरिकेतील मैत्रीण कॅरोलिन डाल हिने “द लाइफ ऑफ डॉ. आनंदीबाई जोशी’ या नावाचे चरित्र इंग्रजीत लिहिले, ते लगेच 1889 साली प्रसिद्ध झाले. काशीबाईंनी गोविंदरावांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वतः गोपाळराव जोशी यांनी पुरवलेल्या माहितीवरून “डॉ. आनंदीबाई जोशी : चरित्र व पत्रे’ हे चरित्र 1891 साली लिहिले.
काशीबाईंनी “हरिभाऊंची पत्रे’ (1929) या शीर्षकाने पत्रे संपादित केली. विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांच्या “ऍट द फीट ऑफ द मास्टर’ या पुस्तकाचा “गुरुपदेश’ (साधनचतुष्टय) या शीर्षकाने त्यांनी अनुवाद केला. “शेवट तर गोड झाला’ हा पहिला कथासंग्रह लिहिणाऱ्या काशीबाईंचे पुढचे आयुष्य मात्र कष्टाचेच गेले. गोविंदरावांचे 1918 साली निधन झाले, तर मुलगी ऐन तारुण्यात मृत्यू पावली. पुढे काशीबाईंचा मुलगा वाराणशीला गेला.
त्यामुळे त्याच्या बरोबर त्याही वाराणशीला गेल्या. वाराणशी येथे त्यांनी विद्यापीठामध्ये अध्यापनाचे काम केले. आपल्या उतारवयात त्यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले होते. 1909 पर्यंतच्या घटनांची नोंद दिसते. ते अपुऱ्या अवस्थेत राहिले होते. डॉ. सरोजिनी वैद्य यांच्याकडे त्यांच्या आप्तांनी ते सुपूर्त केल्यावर 1980 साली सरोजिनी वैद्य यांनी 1909 नंतरचे 1948 पर्यंतचे म्हणजे काशीबाईंच्या मृत्यूपर्यंतचे चरित्र लिहिले.
कै. काशीबाई कानिटकर : आत्मचरित्र व चरित्र (1861 ते 1948)’ हे चरित्र प्रकाशित केले. 1904 साली पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनात उपस्थित असलेल्या त्या एकमेव स्त्री होत्या. 1910 साली भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास त्या हजर होत्या. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांचे निधन झाले.