गो. नी. दांडेकरांच्या “पवनाकाठच्या धोंडी’ आणि “माचीवरला बुधा’ या दोन्ही कादंबऱ्या काहीशा एका वाटेने जाणाऱ्या वाटत असल्या तरी “धोंडी’ आणि “बुधा’ ही दोन्हीही पात्रं वाचकांच्या मनावर वेगवेगळ्या पद्धतीने राज्य करतात. धोंडी आणि बुधा मातीवर प्रेम करणारे, निसर्गावर जीव टाकणारे, माणसांशी मैत्री साधणारे आणि काहीएक ध्येयनिश्चिती असणारे वेडे पीर!
पन्नास वर्षांपूर्वी 128 पानांमध्ये बुधाचे व्यक्तिचित्र साकारलेली ही कादंबरी भाषेचा एक वेगळाच फुलोरा हळूवारपणे फुलवित जाते. कादंबरीच्या प्रारंभीच बुधा मनमाड पॅसेंजरने निघालेला दिसतो. कर्जतच्या पुढे आल्यावर बुधा इतर प्रवाशांचे पाय तुडवित दाराकडे धावतो आणि डोक्यावर हात ठेवून समोरचा डोंगरमाथा न्याहाळतो. बुधाच्या एका डोळ्यात फूल पडलंय तर दुसऱ्या डोळ्याची दृष्टी कमी झालेली. पण तरीही उगवतीकडची डोंगरपट्टी तो न्याहाळतोय. रस्त्यातले बोगदे ओलांडत चौदाव्या बोगद्याबाहेर गाडी येते आणि बुधाला हवं ते दिसतं. तिथे असते किल्ले राजमाची. गोनीदा तेथे अतिशय सुंदर शब्द वापरतात. ते म्हणतात, “”त्याचं मन हरीखानं मोहरलं.”
गाडी लोणावळा स्टेशनवर थांबते आणि बुधा बाहेर पडतो. मुंबई-पुणे रस्ता ओलांडून बुधा तरातरा तुंगारली गावात शिरतो. तेथे त्याला माचीकडून डोक्यावर तुपाची चरवी घेऊन येणारा बोंबल्या येताना दिसतो. बुधाला पाहून तो आश्चर्यचकित होतो. दोघं एकमेकांची चौकशी करतात. बुधाच्या बोलण्यात टेमलाईचे पठार, श्रीवर्धन-मनरंजन याचेच संदर्भ येतात. बोंबल्या त्याला थोडंसं वेड्यात काढतो. “टेमलाईचे पठार काही भाकरीचा तुकडा आहे का कोणी पळवून न्यायला’ असे तो गमतीने बुधाला विचारतो. बुधा मात्र गंभीरच असतो.
बुधा भरभर चालू लागतो. रस्त्यात त्याला काही ठाकरणी भेटतात. माचीजवळच्या वळंज गावच्या त्या. आजूबाजूला डोंगरांची रांग, गच्च झाडोरा, मधूनमधून शेतीचे पट्टे सारं काही बुधाच्या मनाला आनंद देणारे. त्याचं सारं लहानपण आणि तारुण्य ह्याच रानात गेलेलं. हिरव्या मित्रांच्या सान्निध्यात त्याने भोवतीच्या साऱ्यांना हाका घातलेल्या. बुधा आणखी पुढे सरकतो. कडेपठारावर पोहोचतो आणि त्याला लांबवर आवळ्याजावळ्या भावासारखे राजमाचीचे बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन अंधुक-अंधुक दिसते. किल्ले दिसताच त्याच्या म्हाताऱ्या डोळ्यात पाणी उभे राहते. ते सारं वातावरण त्याला झपाटून गेल्यासारखं वाटायला लागते. तो चालतच राहतो. धोतर कुसळांनी भरतं तरी बुधाला त्याचं भान राहात नाही. रस्त्यात लागलेल्या ओहोळाचे थंडगार पाणी पिऊन तो ताजातवाना होतो आणि चालू लागतो. वाटेत काही मुलं त्याला भेटतात. ती खेळत असतात. हा नवा पाहुणा त्यांना गमतीचा वाटतो. टेमलाईच्या पठाराची जमीन त्याची आहे हे जेव्हा तो पोरांना सांगतो तेव्हा पोरांना त्याची गंमत वाटते.
बुधा पुढे सरकतो. त्याची जमीन त्याच्याजवळ येते. उंबराच्या झाडाखाली चौथऱ्यावर त्याची झोपडी उभी असते. जवळजवळ पडावयास आलेली ती झोपडी आता दुरुस्तीशिवाय वापरणे अशक्यच असते. गड नांदता होता तेव्हा पाण्याची टाकी स्वच्छ असायची. हळूहळू गड रिकामा होतो आणि बुधाचा बाप पोराबाळांना घेऊन मुंबईला निघतो. बरीच वर्षे बुधा मुंबईत राहतो. तिथं तो गोदीत काम करतो. भायखळा स्टेशनवर हमाली करतो. त्यांच्या डोळ्यात फूल पडले. मग काम मंदावतं. तोपर्यंत बुधाचा मुलगा भिवा हाताशी येतो. तो गिरणीत कामाला लागतो आणि बुधा घरी बसतो. पण वेळ जाणे अवघड होते. मग त्याच्या अधू डोळ्यांसमोर सगळ्या माचीभोवतीच्या आठवणी तरंगत राहतात. पाण्यात डुंबणं, इकडेतिकडे हुंदडणं, करवंदांच्या जाळ्यातली करवंदं खाणं, मधाच्या पोळ्यातलं मध मटकावणं, असं बरंच काही काही बुधाला फार फार आठवायचं. त्याचं खाणंही नंतर नंतर कमी होतं. तसं मुंबईच्या चाळीतल्या लोकांना बुधाला बरं नाही की काय असं वाटू लागतं. पुढे पंधरा दिवस बुधा वेगळ्याच तंद्रीत असायचा. शेजारची म्हातारी भिव्यावर डाफरते. बुधाला बरं नाही, तो नीट खातपीत नाही हे ती भिव्याला सांगते. मग सारेच काळजी करू लागतात. पण बुधाचे दुखणे वेगळेच असते. बुधाला टेमलाईचे पठार साद घालत असते. श्रीवर्धन-मनरंजनच्या आठवणी त्याला बेचैन करीत असतात. रानाची हाक त्याच्या कानात गुंजत असते. शेवटी तो भिव्याला सांगतो, मला मुंबई गोड लागत नाही. मला आता राजमाचीकडे-गावाकडे जाऊ दे. सगळ्यांनाच मग तो सांगतो, “मला काहीही झालेले नाही, मला आता माझ्या रानाकडे जाऊ द्या.
बुधाचा आग्रह भिव्याला मोडवेनासा होतो. शेवटी बुधाला गाडीत बसवून देतो आणि बुधा गावी पोहोचतो. बुधा गावात पोहोचल्यावर गावातले चार-सहा म्हातारे त्याच्याभोवती गोळा होतात. चौकशी करतात आणि बुधा आता मुंबईला परत जाणार नाही हे ऐकून चकित होतात. बुधा कामाला लागतो आणि त्याचं झोपडं हळूहळू उभं राहतं. आपण आता पठारावरच राहणार हे बुधा मुलाला कळवतो. त्याच्या डोळ्याची अधू दृष्टी पाहून एक ठाकर त्याला झाडपाल्याचं औषध डोळ्यात घालायला देतो. पहिला उन्हाळा थोडासा जड जातो. तळ्याच्या भोवतीचा गाळ बुधा काढतो. दगडं रचून नीट पाणवठा उभा करतो. बुधा ठाकरांच्या मदतीने एवढ्या वर्षांचं त्याच्या जमिनीवरचं गचपण साफ करतो. मधून मधून लोणावळ्याला जाऊन काही वाणसामान घेऊन येतो. बाहेरचं काम झालं की जमिनीला भिडायचं आणि जमिनीचं झालं की घराची वास्तपूस्त करायची अशी दिनचर्याच बुधाची ठरून जाते.
दिवस जातात कितीतरी आणि एक दिवस बुधाच्या कानावर एक वेगळाच घुमत्कार पडतो. त्याला काही कळत नाही हा आवाज कसला. पण मग क्षणातच त्याला ढगातून अवचित बाहेर पडलेलं विमान दिसतं. ते बुधाच्या डोक्यावरुन सुर्रकन पुढे जातं आणि हळूहळू पुण्याच्या दिशेने दिसेनासं होतं. बुधाला त्या विमानाविषयी जवळीक निर्माण होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा विमान येतं. मग रोजच येतं आणि बुधाच्या आयुष्याचा जणू एक भागच होतं. रोज ठराविक वेळेत बुधा विमानाची वाट बघत बसतो. विमान गेलं की मग आपल्या कामाला लागतो.
एका तुटलेल्या कड्याजवळ नांदुरकीच्या झाडाचा झोका झालेला असतो. बुधा एक दिवस खाली पाय सोडून झोक्यावर बसतो. त्याला खूप मजा वाटते. बस् त्या दिवसापासून कंटाळा आला की त्या झोक्यात बसण्याचा त्याचा एक वेगळा उपक्रम सुरू होतो. पावसाळा जवळ येतो. पाऊस साऱ्या रानाला चिंब करू लागतो. बुधा हरखतो. सर्वदूर हिरवंगार लुगडं नेसलेली धरा त्याला आनंदित करते. बुधाच्या झोपडीभोवती खारुताई बागडू लागतात. त्यांना तांदळाचे दाणे घालण्याचा एक नवीन उपक्रम सुरू होतो. एका खारुताईच्या दहापाच होतात. त्यांची झुंडच रोजच्या रोज येऊ लागते. मग तांदूळ परवडत नाही म्हणून नागलीच्या कडक भाकरीचा भुगा तो त्यांना घालू लागतो.
रानात वाघाचं भय म्हणून सोबतीसाठी बुधा गावातून एक कुत्र्याचं पिलू आणतो. सुरुवातीला राहण्यासाठी तयार नसलेलं ते पिलू मग आनंदाने राहू लागतं आणि बुधाच्या आयुष्याचा एक भाग बनतं. एक दिवस डोंगराखालच्या दरीत काही सैनिक राहुट्या लावताना दिसतात. बुधाला ते आपले पाहुणे वाटतात. त्या पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी वरूनच त्यांना हाक मारतो. पण त्यांच्यापर्यंत ती कशी जाणार? मग, रोज सकाळी उठून वरून त्यांच्या कवायती बघणं, हालचाली टिपणं सुरू होतं. सातव्या दिवशी सगळी पलटण परत जाते. बुधाला खालचं रान ओकंबोकं वाटू लागतं. बुधाचा रानावर जीव, कुत्र्यावर जीव, खारुताईवर जीव, विमानावर जीव, सगळ्या भोवतालावरच जीव. बुधाचा शेजारी बोंबल्याला दरवर्षी एक पोर होत जातं. त्याचा वाढता परिवार बुधाला जवळचा वाटे. मुंबईला असताना बुधा कथाकीर्तनाला जाई. तेथे कानावर हरिनामाचे चार शब्द पडत. त्यामुळे येथेही सकाळी लवकर उठला की “अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र’ पासून बुधाचे जागरण सुरू होई.
एक दिवस बुधाला शोधत शोधत त्याचा मुलगा भिवा येते. रात्रभर राहतो. बापाला मुंबईला परत चल म्हणून सांगतो; पण बुधा काही जात नाही. त्याचं वावर त्याला सोडवत नाही. माचीचा परिसर त्याला त्याचाच वाटत राहतो. शेवटी वैतागून त्रागाने मुलगा निघून जातो. सकाळपासून रात्रीपर्यंत बुधासोबत कुत्रं असे. रात्री बुधाच्या अंथरुणातच ते झोप घेई. कुठे खुट्ट झालं की ते जोरजोरात भुुंकायला लागे. एकदा ते खूप भुंकायला लागतं. त्याचा वेगळा आवाज ऐकून बुधा उठतो, बाहेर जातो. कुत्रंही पुढे जातं आणि त्याची किंकाळी कानी पडते. बुधाच्या छातीत धस्सं होतं पण पुढे जाणं शक्य नसतं. सकाळी बुधा कुत्र्याला शोधायला निघतो तेव्हा जंगलात बुधाला त्याचं प्रेत सापडतं. वाघाने त्याला फाडलेलं असतं. बुधाला प्रचंड दु:ख होतं.
एक दिवस एक म्हैस रात्रीची बुधाच्या दाराशी येऊन बसते. तिला पायाजवळ खूप मोठी जखम झालेली असते. ती मरतुकडी म्हैस सकाळी बुधाला दिसते. उठता उठत नाही. बुधा काळजीने बघतो तेव्हा त्याला ती जखम दिसते. मग तो ती स्वच्छ करतो आणि तेथे हळद भरतो. हळूहळू जखम भरते आणि म्हैसही तेथेच राहते. एक दिवस म्हशीचा धक्का लागून बुधा उतारावर कोसळतो आणि गचपणात घसडत जातो. त्याला मुका मार लागतो. रात्री कसकस येते. जवळ कोणी नसते. ताप वाढतच जातो. कसंबसं काहीतरी करून तो खातो. एके रात्री त्याला कसलातरी भास होतो. तो अंथरुणावर उठून बसतो. त्याला वाटतं कोणी वनपुरुषच जणू आलाय. तुकारामांचा “वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ हा अभंग त्याला आठवतो आणि हा वनपुरुष त्याला सोयरा वाटू लागतो. अखेरीस त्याला अंथरुणावरून उठेनासे होते. सोयरा वनचर सारखा सारखा त्याला दिसू लागतो. आणि अखेरीस एका सकाळी झोपडीच्या दाराशी आलेल्या खारुताईंना त्यांचे खाद्य दिसत नाही. चिमण्यांना बुधाची चाहूल लागत नाही. खारुताई दाराशी येतात, चिमण्या चिवचिवाट करतात, तरीही बुधा जागा होत नाही. मग त्या चिमण्या-खारुताई आत शिरतात त्यावेळी त्यांना त्यांचा मायाळू धनी शांत झोपला आहे आणि त्याच्या अंगाला मुंग्या लागलेल्या आहेत असे दिसते. येथे ही कादंबरी संपते आणि बुधाचा अवतारही संपतो. अत्यंत रसाळ निवेदनशैलीतून उभा राहिलेला बुधा कायमस्वरूपी वाचकाच्या मनात घर करतो.
विनोद गोरवाडकर