सध्याचे युग हे संगणकाचे युग असले तरी ते धावपळीचेही युग आहे. या युगात प्रत्येकजण धावत आहे. स्वप्नांचा पाठलाग करताना कितीही दमछाक झाली तरी प्रत्येकाला धावायचे आहे. प्रत्येकाच्या इच्छा,आकांक्षा आणि अपेक्षा वेगळ्या असल्या तरी जो तो आपापल्या परीने सतत प्रयत्नशील आहे. यश, अपयश, ताणतणाव, दगदग, समाधान आणि दुःख यांचा लपंडाव तर आलाच. परंतु या लपंडावातून येणारे नकार आणि त्यातून निर्माण होणारी निराशाजनक स्थिती दैनंदिन जीवनावर मोठे परिणाम करते.
गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. हातात मोबाइल देण्यास पालकांनी नकार दिल्याने दहा वर्षांच्या मुलाची आत्महत्या. ही बातमी अक्षरशः सुन्न करणारी होती. एवढ्या छोट्या गोष्टीचे एवढे भयावह परिणाम होण्यामागचे कारण नक्की काय आहे? यात नक्की चूक कोणाची मुलाची की पालकांची? साहजिकच सर्वजण मुलालाच दोषी ठरविणार. कारण मुलाला मोबाइलचे वेड होते, मुलगा जास्त हट्टी होता वैगरे कारणे दिली जाणार. पालकही मुलाला आपण मोबाइल दिला असता तर आज हे झाले नसते असा विचार करणार. परंतु हे उचित आहे का? तर नक्कीच नाही कारण यात चूक एका कोणाचीही नाही. चूक आहे ती मुलांत रुजलेल्या नकारात्मक मानसिकतेची. ज्याला त्याचे पालकही तितकेच जबाबदार होते. कारण दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी शिकविल्या जाणाऱ्या धड्यांत त्याला नकार पचविण्याचा धडा शिकविला गेला नव्हता.
आज नकार पचविता न आल्याने अनेक घटना घडल्याच्या पहायला मिळतात. एखाद्याला व्यवसायात, नोकरीत नकार मिळाला तर तो तणावात जातो. प्रेमप्रकरणात नकार मिळाल्यास स्वतःला किंवा समोरच्या व्यक्तीला अपाय होईल अशी कृती होते. एखादी गोष्ट करण्यास घरातून नकार मिळाल्याने वादविवादाने कौटुंबिक कलह निर्माण केले जातात. या एक ना अनेक गोष्टी मानसिक आरोग्यावर परिणाम करून तणावग्रस्त परिस्थितीस पाचारण करतात. नकार म्हणजेच अस्वीकारार्हता. एखाद्याने समोरच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे न स्वीकारणे. यात सर्व गोष्टी या व्यक्तीच्या विचारप्रक्रियेवर अवलंबून असतात. मात्र हा नकार बरेचदा मनाला हुरहूर लावून जातो. काही नकार सहज सोडून दिले जातात. मात्र काही नकार हे मनपटलावर तीव्र घाव करून जातात.
कुणीतरी आपल्याला नाकारल्याची भावना ही निश्चितच वेदनादायी असते. परंतु ही भावना जर आपण नकारात्मक मानसिकतेने उराशी कवटाळून बसलो तर मात्र त्यातून धोकाच निर्माण होत असतो. नकारातून असुरक्षितता, संताप, मनाची उद्विग्नता तसेच आत्मसन्मानास ठेच लागण्याची भावना बाळगली जाते. पुढे यातून सूडबुद्धीने स्वतःचा किंवा इतरांचा घात करण्याची भावना बळावते. नकार पचविणे म्हणजे अपयशाच्या वाटेवर चालण्यासाठी सज्ज असणे असा समज करणे चुकीचे आहे. नकारातून बोध घेऊन पुढे स्वीकारासाठी प्रयत्नशील राहता येणेही खूप महत्त्वाचे आहे. नकाराकडे पाहताना सकारात्मकतेने पाहायला हवे. आज मिळालेला नकार हा उद्याच्या अधिक चांगल्या यशाची नांदी ठरणारा आहे अशी मानसिकता असायला हवी. खेळात, स्पर्धांत, कामात, संबंधांत आणि इतर गोष्टींत नकाराला खिलाडूवृत्तीने स्वीकारता आले पाहिजे. तो नकार मिळण्यामागचे कारण शोधून त्यावर मात करून पुढच्या वेळेस स्वीकारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीवर उपाय असतोच फक्त तो शोधणे गरजेचे असते. नाकाराबाबतही हीच गोष्ट लागू होते. त्याचे कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे यापेक्षा उत्तम मार्ग नाही. म्हणूनच नकार पचविण्याची ताकद प्रत्येकाने मिळविली पाहिजे.
आज जगात अनेक यशस्वी व्यक्तींनाही नकार पचवावा लागला आहे. मात्र या व्यक्तींनी हा नकार जिव्हारी न लावता त्यालाच यशाचा दुवा बनवित जगासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. चुका, अपयश आणि नकार हा एका प्रगतीचाच भाग असतो. कोणीही यांना सामोरे न जाता कधीही यशस्वी होऊ शकत नाही. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी नकाराबद्दल अतिशय समर्पक विधान केले आहे. आईनस्टाईन म्हणाले होते की, ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला त्यांचा मी खूप आभारी आहे कारण त्यांच्यामुळेच आज मी या गोष्टी स्वतः करू शकलो. या विधानातून नकार पचविणारी माणसे आयुष्यात कशी यशस्वी ठरतात हे दिसून येते. लक्षात ठेवा आपल्या मानसिकतेची काळजी घेणे ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. त्यामुळे नकाराचा आघात मनावर होऊ द्यायचा नाही. एखादा नकार आपल्या जीवनमरणास कारणीभूत ठरण्याइतका मोठा नक्कीच नाही. आपली सशक्त आणि सकारात्मक मानसिकताच नकार पचवून पुढे मार्गक्रमण करण्याची शक्ती देऊ शकते.
सागर ननावरे