पिंपरी – गणेशोत्सवामध्ये फुले आणि फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या वाढत्या मागणीमुळे सध्या फळांचे आणि फुलांचे दर आकाशाला भिडले आहेत. मोकळ्या फुलांचे दर जरी शंभर ते चारशे रुपये किलो दरम्यान असले तरी तयार हारांची किंमत मात्र फुलांच्या कित्येक पट अधिक आहे. अवघ्या आठ ते दहा फुलांपासून बनविण्यात आलेल्या साध्या हाराची किंमत देखील चाळीस रुपयांपासून सुरू होत आहे. प्रत्येक घरात रोज गणरायाला घालण्यासाठी हार लागणार असल्याने विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात हारांच्या किंमती वाढविल्या आहेत.
हारांच्या वाढलेल्या किंमतीमुळे काही नागरिक फुले आणून घरातच हार बनवित आहेत. याचप्रमाणे फळांचे भाव देखील वधारले आहेत. सध्या बाजारात कच्ची केळी 40 रुपये तर पिकलेली केळी 50 ते 60 रुपये डझन प्रमाणे मिळत आहे. सफरचंद 100 ते 140 रुपये किलो, मोसंबी डाळिंब, चिकू 70 ते 90 रुपये किलो, तर सिताफळ 90 ते 140 रुपये किलो दराने मिळत होते. या फळांबरोबरच इतर फळांचे भाव देखील वाढले असून गणेशोत्सव संपेपर्यंत फळांचे वाढलेले भाव कायम राहतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
झेंडू, शेवंतीने खाल्ला भाव
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासूनच फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, यावर्षी फुले खरेदी करताना नागरिकांना खिशाला चांगलीच झळ सोसावी लागत आहे. यावर्षी झेंडूचे दर 100 ते 120 रुपये किलो, शेवंती 250 ते 300 रुपये किलो व निशिगंधाची 400 ते 450 रुपये किलो अशा उच्चांकी दराने विक्री झाली.
बाजारात फुलांची आवक अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. गुलाबाचे एक फुल 10 रुपयापासून 20 रुपयांपर्यत मिळत होते. फुलांचे दराच्या तुलनेत हारांच्या किंमतीमध्ये तर अव्वाच्या सव्वा वाढ झालेली पहायला मिळाली. गौराई आणि गणेशोत्सव संपेपर्यंत फुलांचे वाढलेले दर असेच कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.