* सहा दिवसांपासून मावळ पट्ट्यासह खेडच्या पूर्व-पश्चिम भागात मुसळधार
* नदीकाठच्या परिसरात रेड अलर्ट जारी
आळंदी – गेल्या सहा दिवसांपासून मावळ पट्ट्यासह खेडच्या पूर्व-पश्चिम भागात वरुणराजा दमदार कोसळत असल्याने इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीने सध्या धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नदीकाठच्या दोन्ही बाजूने वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे काठाजवळ पाण्याची पातळी वाढ होत असताना आपण योग्य वेळी आपला मुक्काम पर्यायी जागेत हलवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पावसामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, अत्यावश्यक सेवेसाठीच नागरिक कामानिमित्त बाहेर पडत आहेत.
वरुणराजा सततच बरसत असल्याने जमिनीला वापसा येत नसल्याने वरूणराजाने काहीकाठ विश्रांती घेतल्यास पेरणी करण्यास पूरक वातावरण निर्माण होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वरूणराजा आणखी 48 तास असेच धो-धो बरसत राहिल्यास पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे.