जामखेड – शहरात दोन दिवसांपासून संततधार चालू आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गासह बहुतांश लहान-मोठ्या रस्त्यांवरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी खड्ड्यांत पाणी साचून तळी तयार झाल्याचे दिसत आहे. यातून वाट काढणे नागरिकांना कठीण होत आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडून महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्यावर ठिकाणी खड्डेच खड्डे पडून रस्ते होत्याचे नव्हते झाले आहेत. ही परिस्थिती पाहता नागरिकांच्या तोंडातून एकच वाक्य निघते काय रस्ते, काय खड्डे, काय जामखेड… सगळं कसं ओक्केच!
दळणवळणाच्या व नित्य वर्दळीच्या बीड-नगर रस्त्यावर तर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा यक्ष प्रश्न उभा आहे. नगर रोड, बीड रोड, खर्डा रोड, जयहिंद चौक या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे.
पावसाच्या आगमनाने शहरातील या मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, वाहनचालक, पादचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना या मार्गावरून वाट काढणे जिकिरीचे झाले आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या रिपरिप पावसामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांचा त्रास वाढला आहे. त्याच बरोबर रस्ते, नालेसफाई व स्वच्छता कामासाठी नगर परिषद फंड, आमदार, खासदार यांचा निधी येत असतो. परंतु त्या निधीचा योग्य विनियोग केला जात नसल्याचे यावरून दिसत आहे.
शहरात गटारी, मुतारी, शौचालयांचीही दयनीय अवस्था झालेली आहे. गटारी तुडुंब भरल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि विसर्ग होण्यासाठी पाहिजे तशा उपाययोजना होत नसल्याचेच यावरून सिद्ध होत आहे.
नगर रोडवर चिखल व खड्ड्यांचा त्रास वाढला आहे. या रस्त्यावर पाय ठेवणे जिकिरीचे झाले आहे. वाहनांचे लहान-सहान अपघात, विद्यार्थी व लोकांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे, असे प्रकार येथे नित्याचेच झाले आहेत. जामखेड ते सौताडा महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळून सहा महिने होत आले, तरी अद्याप काहीच हालचाली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व रुंदीकरण जेव्हा हाईल तेव्हा होईल, मात्र तत्पूर्वी रस्त्यावरील खड्डे तरी बुजवावे, अशी मागणी केली आहे.तोपर्यंत म्हणाव काय रस्ता, काय खड्डे, काय जामखेड सगळं ओके.