सातारा -राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. दरम्यान, सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीही स्थगित झाल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने दि. 5 जुलै रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात मंगळवारी सुनावणी झाली. एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे.
सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 13) सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा होणार कार्यक्रमही स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.