नवी दिल्ली – हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार देशाच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषत: उत्तर भारतात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये काही भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे, दरडी कोसळल्यामुळे त्यासोबतच नद्यांना आलेल्या पुरामुळे आतापर्यंत जवळपास 56 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुढील 24 तास घराबाहेर पडू नये, असे आवाहन हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून राज्यातील सात शहरांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता.
यापैकी, तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
त्याचप्रमाणे मनाली येथे पूरसदृश स्थितीमुळे काही दुकाने वाहून गेली आहेत, तर कुलूसह काही शहरांत आलेल्या पुरामुळे वाहने वाहून गेल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमधील अनेक शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या सगळीकडे या भागातील परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.