पुणे – मागील काही दिवसांपासून पुण्यातून गोवा, दिल्लीसह दुबईला जाणाऱ्या विमानांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या घटना वारंवार घडूनही विमानतळ प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नाही, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बुधवारी (दि. 22) दुबईला जाणाऱ्या विमानाला तब्बल 10 तास उशीर झाला. त्यामुळे रात्री प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत थांबावे लागले.
पुण्यातून सध्या दुबई व सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. पुण्यातून दुबईला दररोज रात्री आठ वाजता विमान उड्डाण घेते. मात्र, मागील काही महिन्यांपासून दुबईला जाणाऱ्या विमानाला उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांना मध्यरात्रीपर्यंत विमानतळावर ताटकळ थांबावे लागते. आंतरराष्ट्रीय विमान सेवेला सतत उशीर होऊन देखील त्याच्याकडे विमानतळ प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाकडून हा विमान कंपन्याचा प्रश्न असल्याचे सांगत जबाबदारी टाळली जात आहे. त्यामुळे याकडे विमानतळ प्राधिकरणाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
बुधवारचे उड्डाण झाले गुरूवारी…
बुधवारी (दि. 22) रात्री आठ वाजता पुण्यातून दुबईला विमान उड्डाण करणे अपेक्षित होते. मात्र, ते विमान गुरूवारी (दि. 23) सकाळी सहा वाजता उड्डाण केले. त्यामुळे दुबईला निघालेल्या सर्व प्रवाशांना रात्रभर विमानतळावर थांबावे लागले. त्यामध्ये महिला, लहान मुलांचाही समावेश होता. प्रवाशांकडून विमानाला उशीर होण्याबाबत स्पाईट जेटच्या अधिकाऱ्यांना विचारले जात होते. पण, त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नव्हते.