सातारा – लोणंद परिसरात मारहाण, लूटमार व गायींची चोरी करणाऱ्या पाच जणांची टोळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील तीन आणि सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.
टोळीप्रमुख पप्पू सर्जेराव जाधव (वय 24) व संजय उर्फ दादा बारीकराव जाधव (वय 37, रा. मुळीकवाडी, ता. फलटण), अजित महादेव बोडरे (वय 28) व अनिल अशोक तुपे (रा. तांबवे, ता. फलटण) आणि तुषार बाळासाहेब पाटोळे (वय 20, रा. तरडगाव, ता. फलटण) अशी संशयितांची नावे आहेत. या पाच जणांवर वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती.
परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यांच्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव लोणंद पोलिसांनी बन्सल यांच्याकडे पाठवला होता. त्यावर सुनावणी घेऊन बन्सल यांनी पाच जणांना संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती, भोरे व पुरंदर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशीरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस, लोणंद पोलीस ठाण्याचे हवालदार नाळे यांनी हद्दपार प्राधिकरणासमोर पुरावे सादर केले. अशांतता पसरवणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्याचा इशारा बन्सल यांनी दिला आहे.
तडीपारीची शंभरी
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आतापर्यंत 28 प्रस्तावांवर सुनावणी घेऊन संबंधितांच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत. ताज्या प्रस्तावानुसार त्यांनी पाच जणांवर तडीपारीचा आदेश बजावला. बन्सल यांच्या कार्यकाळात तडीपार केलेल्यांची एकूण संख्या 103 झाली आहे.