नेवासा, (प्रतिनिधी) – वाकडी (ता.नेवासा) येथील बायोगॅसच्या जुनाट विहिरीत पडलेले मांजर वाचविण्याच्या प्रयत्नात मंगळवारी सहा जण विहिरीत पडलेले होते. त्यापैकी विजय माणिक काळे (वय ३५) हे सुदैवाने बचावले. पाच जणांचा बायोगॅसच्या जुनाट विहिरीत पडून गुदमरून अंत झाल्याच्या दुर्देवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला होता.
मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शर्तीचे प्रयत्न करून मृतकांना बाहेर काढण्यात यश आले. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाचही जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीप्रसंगी गावकऱ्यांनी मोठ्या अश्रूनयनांनी टाहो पिटत शेवटचा निरोप दिला.
मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गोठ्यातील शेण – मूत्र सोडण्यात येणाऱ्या जुनाट विहिरीत एक मांजरीचे पिल्लू पडल्यामुळे या मांजरीला बाहेर काढण्यासाठी विशाल अनिल काळे उर्फ बबलू (वय २८) हा विहिरीमध्ये उतरला.
विशाल हा गटांगळ्या घेत असल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील अनिल बापूराव काळे (वय ५५) हे विहिरीत उतरले मात्र, ते सुद्धा विहीरीत बुडत असल्याचे पाहून त्या बापलेकांना वाचविण्यासाठी माणिक गोविंद काळे (वय ६५) विहिरीत उतरले. त्यांनाही या दोघांना अखेर बाहेर काढता आले नाही.
तेही विहीरीत बुडत असल्याचे पाहून त्यांचा मुलगा संदीप माणिक काळे (वय ३२) हा उतरलाअसता विहिरीत बुडू लागला. त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचा भाऊ विजू माणिक काळे (वय ३५) विहिरीत फसला गेला. त्यामुळे या शेतात काम करणारा गडी बाळासाहेब गायकवाड (वय ४०) याने विहिरीत उतरुन पडलेल्या या पाच जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तो सुद्धा शेणमूत्रात अडकला गेला.
मांजरीला वाचविण्याच्या नादात सहा जण विहिरीत उतरले असता मांजरीला तर वाचविता आलेच नाही पण एका मागोमाग एक असे पाच जण विहिरीत उतरुन फसले गेल्यामुळे एकाला एक वाचविण्याच्या नादात पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना वाकडी येथे घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.
घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, ऋषिकेश शेटे,अंकुश काळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश डिके हे मदतकार्यात सहभागी झालेले होते.
यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्यामुळे विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यास मोठा अडथळा ठरत असल्यामुळे पोलिसांनी विहिरीजवळची गर्दी हुसकल्यानंतर पुन्हा गर्दी जमत असल्यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होता.
अखेर रात्री ११ वाजेच्या सुमारास ५० फुटी पोकलेन मशीन आणि लोकनेते ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विहिरीमधील गाळ आणि चिखल काढण्यासाठी असलेली यंत्रसामुग्री आल्यानंतर रात्री उशीरा साडेबारा वाजेच्या सुमारास पाचही मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले. बुधवारी सकाळी आमदार शंकरराव गडाख यांनी काळे कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले. यावेळी अंत्यविधीस मोठी गर्दी उसळलेली होती.
जिल्हाधिकारी, एसपी घटनास्थळी तळ ठोकून
काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे,उपअधीक्षक सुनील पाटील, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार डॉ.संजय बिरादार, पोलीस निरिक्षक धनंजय जाधव, महसूल, पोलीस, आरोग्य खात्याचे अधिकारी रेस्क्यु ऑपरेशन यशस्वी होईपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते.