खेडच्या तहसीलदार आमले : लॉकडाऊनचा साठा उपलब्ध झाल्यानंतर वाटप सुरू होणार
राजगुरूनगर -लॉकडाऊन काळाकरिता सरकारने घोषित केल्याप्रमाणे मिळणाऱ्या धान्याचे मोफत वाटप केले जाणार असून, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र अर्ज सादर करण्याचे सरकारचे आदेश नाहीत.
येत्या आठ दिवसांत हा साठा उपलब्ध झाल्यानंतर प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत वितरीत केला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
लॉकडाऊन काळात तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेची माहिती देण्यासाठी तहसीलदार कार्यालयात गुरुवारी (दि. 2) पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी आमले यांनी ही माहिती दिली.
आमदार दिलीप मोहिते पाटील, राजगुरूनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पुरवठा अधिकारी गणेश रोकडे, दीपक मडके यावेळी उपस्थित होते.
तहसीलदार आमले म्हणाल्या की, खेड तालुक्यात 188 स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदय कार्ड धारकांमध्ये 288 शहरी आणि 2527 ग्रामीण लाभार्थी, प्राधान्य गटातील कार्डधारकांची शहरी 8895 व ग्रामीण भागातील 42,615 एवढी संख्या आहे.
शहरी कार्डधारकांची 41 हजार 437 सदस्य, तर ग्रामीणची 2 लाख 35 हजार, 823 सदस्य संख्या आहे. यातील प्रत्येक कार्डप्रमाणे प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ वितरीत केला जाणार आहे.
सध्या वाटप करण्यात येत असलेल्या गहू, तांदळाचे नेहमीप्रमाणे पैसे देणे कार्डधारकांना बंधनकारक आहे. तर लॉकडाऊन काळाकरिताचे येणारे धान्य मोफत वाटप केले जाणार आहे. शहरात नगरपरिषद घरपोच वाटप करणार आहे, तर ग्रामीण भागात गर्दी न करता दुकानदारांनी
वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ज्यांचे स्वस्त धान्य कार्ड तालुक्यात नाहीत व ते येथे वास्तव्यास आहेत, अशा लोकांना आधार लिकिंगद्वारे जवळच्या दुकानात धान्य देण्यात येईल. ज्यांच्याकडे कार्ड नाही अशा लोकांना सहकार्य करण्याच्या हेतूने स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी योगदान दिले आहे.
त्याद्वारे या नागरिकांना दोन वेळचे जेवण, जीवनावश्यक वस्तू मोफत देण्यात येतील. त्यांनी स्थानिक पातळीवर तलाठी, ग्रामसेवक अथवा तहसीलदार कार्यालयात संपर्क साधावा, असे
आवाहन तहसीलदार आमले यांनी केले आहे.
तालुक्यात चार शिवभोजन केंद्र सुरू
खेड तालुक्यात आळंदी, राजगुरूनगरात प्रत्येकी एक, तर चाकण येथे दोन शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. प्रत्येक केंद्रातून 100 याप्रमाणे 400 पॅक थाळी रोज सकाळी एकदा वितरीत केली जाणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 5 रुपये शुल्क देऊन घ्यावी. ज्यांची आर्थिक स्थिती नाही त्यांना ती मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.