आळंदी (पुणे) : संत चोखामेळा यांच्या साहित्याला उजाळा देण्यासाठीच्या पायाभरणी स्वरूपातील हे पहिले साहित्य संमेलन आहे. भविष्यात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर देखील संमेलने निरंतर होत राहतील, नवे साहित्यिक, संशोधक जोडले जाऊन चोखोबांच्या साहित्यावर नव्याने भाष्य करण्यासाठी पुढे येतील आणि त्यातून नक्कीच या परिवाराच्या साहित्यावर नवा प्रकाश पडत राहील, असा विश्वास संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य अप्पासाहेब पुजारी यांनी व्यक्त केला. संत चोखामेळा यांच्या साहित्यावरील संमेलनातील चर्चेनंतर साहित्यरूपी चोखोबाचे मंदिर तयार होईल आणि संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पुण्यभूमीत चोखामेळा यांच्या परिवाराच्या साहित्यावरही कळस चढून तो सतत प्रकाशमान होत राहो, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृदांवन फाऊंडेशनतर्फे आळंदी येथे दोन दिवसीय (दि. 18, 19 नोव्हेंबर) पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेनलाचे आयोजन एम. आय. टी. महविद्यालयात करण्यात आले आहे. यावेळी अप्पासाहेब पुजारी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सम्मेलनाचे उद्घाटन पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ह.भ.प. माणिकबुवा मोरे महाराज, माधव महाराज नामदास, प्रा. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर, प्रा. उल्का चंदनशिवे, सचिन पाटील यांसह अनेक वारकरी, भाविक मंडळी उपस्थित होते.
विठ्ठलाला विचारलेले प्रश्न म्हणजे…
वारकरी पंथातील समानतेचा, समभक्ती भावरसतेचा मेळ संत चोखामेळा यांच्या भक्तीतून दिसून येतो. संत चोखोबांच्या रूपाने विठ्ठल भक्तीचा महिमा सांगणारा एक महान संत ज्या संताने आपल्या भक्तीच्या जोरावर विठ्ठलाशी असलेले पवित्र नाते दाखवून दिले. संत चोखामेळा यांचे अभंगकाव्य वेदना आणि अश्रू यांनी ओथंबलेले असले तरी ते काव्याच्या निकषांवर रसानुभव देणारी श्रेष्ठ कविता आहे हे जाणवते. संत चोखामेळा यांनी विठ्ठलाला विचारलेले प्रश्न म्हणजे प्रश्नांकित भाषेतून त्यांनी आपल्या मनातील वेदनेची अभिव्यक्ती साकारली हे त्यांच्या अभंगांचे वेगळेपण आहे, असे विचार अभ्यासकांनी परिसंवादात व्यक्त केले.
“संत चोखामेळा यांना पांडुरंगाने कधीही अव्हेरले नाही तर त्या काळातील समाजव्यवस्थेमुळे संत चोखामेळा पांडुरंगाच्या चरणी पोहोचू शकले नाहीत. संत चोखामेळा यांचे कार्य प्रदीर्घ काळ दुर्लक्षित राहिले याचा खेद आहे. दुसरे सम्मेलन पंढरपूरात भरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार” – ह.भ.प. औसेकर महाराज