सासवड – सध्या करोना व्हायरसच्या संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने आपली नैतिक जबाबदारी पार पाडून देशावरील या संकटात एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
मात्र, या आपत्तीतही पुरंदर तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांकडून किराणा मालाची अवास्तव व अवाजवी भावात विक्री केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. प्रशासनाचे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील सासवड, जेजुरी, नीरा याठिकाणी किराणा मालाचे होलसेल व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांची गोडाऊन किराणा मालाने खचाखच भरलेली असूनही जाणीवपूर्वक किराणा मालाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची चढ्या व अवाजवी दराने विक्री केली जात आहे. किराणा व्यापाऱ्यांनी किराणा मालाचे दर भरमसाठ वाढवले आहेत. साखर, तेल, शेंगदाणे यांचे दर गगनाला भिडले आहे.
करोना व्हायरस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण पुरंदर तालुक्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे. तसेच हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल या भीतीपोटी नागरिकांनी तीन ते चार महिन्यांचा किराणा खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी केली आहे.
प्रशासनाकडून गर्दी न करण्याच्या केलेल्या आवाहानाला देखील अनेक नागरिकांनी हरताळ फासला आहे. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांची किराणा मालाच्या दुकानात झुंबड उडाली आहे. गिऱ्हाईकांच्या याच मानसिकतेचा व भीतीचा तालुक्यातील किराणा व्यापारी गैरफायदा घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
व्यापाऱ्यांची गोदामे तपासा
तालुक्यातील शहरी भागातील मोठ्या किराणा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मालाची साठेबाजी केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. किराणा व्यापाऱ्यांच्या या आर्थिक लुटीमुळे मध्यमवर्गीय, गोरगरिबांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या व मोलमजुरी करणाऱ्यांचे उत्पन्न थांबले आहे जे काही थोडीफार बचत केली त्यातच कसेबसे उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.
मात्र, किराणा व्यापाऱ्यांमुळे या गरिबांचे आर्थिक बजेटच कोलमडून गेले आहे. प्रशासनाने अशा साठेबाजी करणाऱ्या व चढ्या दराने किराणा मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर धाडी टाकून किराणा मालाची अवैध साठेबाजी केली आहे का? याची खातरजमा करण्याची गरज आहे.