माधव विद्वांस
नाटककार, कवी, अभिनेते, नेते, संगीतकार, हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची आज जयंती. 2 एप्रिल 1898 रोजी त्यांचा जन्म हैद्राबाद येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे बंगाली होते. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे एक वैज्ञानिक-तत्त्ववेत्ता आणि शिक्षणतज्ज्ञ होते तर आई बरदासुंदरीदेवी या कवयित्री व गायिका होत्या. त्या बंगालीमधून कविता करीत असत. त्यांचे वडील एडिनबर्ग विद्यापीठातून विज्ञानशास्त्रातील डॉक्टरेट होते, त्यांनी हैदराबाद महाविद्यालयाची स्थापना केली होती. सरोजिनी नायडू त्यांच्या भगिनी तसेच कम्युनिस्ट नेते विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हे त्यांचे बंधू होते. अशा उच्चविद्याविभूषित कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
स्वातंत्र्य सैनिक, सहकार चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या, पद्मविभूषण कमलादेवी चट्टोपाध्याय या त्यांच्या पत्नी होत्या. मात्र ते काही दिवसानंतर विभक्त झाले. कमलादेवी आणि हरिंद्रनाथ यांचा घटस्फोट हा भारताच्या कोर्टाने मंजूर केलेला पहिला कायदेशीर घटस्फोट होता. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय नुसतेच अभिनेते नव्हते तर नेतेही होते. भारताच्या पहिल्या लोकसभेचे ते निवडून आलेले सदस्य होते.ते कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून वर्ष 1952 मध्ये त्यावेळच्या मद्रास राज्यातील विजयवाडा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. ते प्रामुख्याने इंग्रजीमध्ये कविता करीत. त्यांच्या इंग्रजी कवितांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले. वर्ष 1962 मध्ये “साहिब बीबी आणि गुलाम’ या चित्रपटामध्ये त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली. हिन्दी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेते म्हणून अभिनय केला. त्यांच्या “साहिब, बिबी और गुलाम’, “बावर्ची’ इ. चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या.वर्ष 1972 मध्ये बावर्ची या विनोदी चित्रपटामध्ये त्यांनी खडूस कुटुंबप्रमुखाची भूमिका पार पाडली. त्यांची ही भूमिकाही प्रेक्षकांना आवडली.
रॅपिंग हा कवितेचा एक प्रकार म्हणून, 1960 आणि 1970च्या दशकात अमेरिकेत प्रचलित झाला. भारतात तो प्रथम हरिंद्रनाथ यांनी आणला. वर्ष 1966मध्ये त्यांनी “रेल गाडी’ ही कविता लिहिली आणि अखिल भारतीय रेडिओवर रॅपमूडमधे स्वतःच्या आवाजात गायली. लहान मुले आणि प्रौढांमध्येही हे गाणे इतके लोकप्रिय झाले होते की अशोक कुमार यांनी हे आपल्या आशीर्वाद या चित्रपटासाठी वापरायचे ठरवले. या गीतामध्ये रेल्वेतून दिसणाऱ्या निसर्गाचे व शेतीचे वर्णन आहे, तसेच वाटेत येणाऱ्या स्टेशनची नावेही रेल्वेच्या ठेक्यामध्ये बसविली आहेत. हे गीत अशोक कुमार यांनी “आशीर्वाद’ चित्रपटात गायले होते. स्वत: हरिंद्रनाथ यांनीही गीते लिहिली, संगीत दिले आणि काही गाणी गायली. त्यांनी हिंदीमध्ये मुलांसाठी अनेक कविताही लिहिल्या.
वर्ष 1973 मध्ये हरिंद्रनाथ यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे 23 जून 1990 रोजी हृदयविकाराने मुंबई येथे निधन झाले.