नवी दिल्ली – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी लवकरच आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
त्यांनी आज प्राप्तिकर, वस्तू आणि सेवाकर तसेच सीमाशुल्क संदर्भातल्या परताव्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या. त्यानुसार आर्थिक वर्ष 2018-2019 साठी आयकर परतावा भरण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली आहे. आर्थिक वर्ष 2018-2019चा प्राप्तिकर उशिरा भरण्यासाठी व्याजदरावर 3 टक्क्यांची सूट देऊन 9 टक्के दराने व्याजदर आकारला जाणार आहे.
आधार-पॅन जोडणीची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणाची अर्थमंत्र्यांनी केली. याशिवाय विवाद से विश्वास योजना 30 जून 2020 वाढविली असून यासाठी 10 टक्के अतिरिक्त शुल्क लादणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मार्च, एप्रिल, मे 2020चा वस्तू आणि सेवाकर परतावा भरण्यासाठी 30 जून 2020 मुदतवाढ देण्यात आली असून सबका विश्वास योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली आहे.
सीमा शुल्क संदर्भात विविध परवानग्या लवकर मिळाव्यात यासाठी 30 जूनपर्यंत 24 तास सीमा शुल्क परवाने मिळत राहतील याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली.