हिंजवडी, दि 18 (वार्ताहर) -दर रविवारी आयटीच्या मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे आठवडे बाजार भरविण्यात येत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने आठवडे बाजार स्थलांतरीत केला. त्यामुळे दर रविवारी गजबजलेल्या शिवाजी चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला.
हिंजवडीतील शिवाजी चौकात एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यांवर व पदपथावर अतिक्रमण करत भाजी, फळविक्रेते, मांस, मच्छी, कपडे व इतर वस्तू विक्री करणारे पथारीवाले अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या बस्थान मांडून बसले होते. त्यामुळे हिंजवडीच्या आठवडे बाजाराला पचक्रोशीतून मोठी गर्दी व्हायची. पुणे, पिंपरी चिंचवडमधून व्यापारी या बाजारात माल आणून विकायचे. स्वस्तात माल मिळत असल्याने पचक्रोशीतून ग्राहकांची मोठी गर्दी व्हायची.
या बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे एका बाजूला पूर्ण रस्ता व्यापाऱ्यांनी घेरला होता तर दुसऱ्या बाजूला खरेदीला आलेल्या ग्राहकांची वाहने उभी राहत असल्याने रविवारी देखील हिंजवडीत वाहतूक कोंडी होत असे. याबाबत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत साखरे यांनी अनेकदा ग्रामसभेत हा अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाला फैलावर घेतले होते. मात्र, झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. त्यामुळे या अनधिकृत बाजारावर कारवाई करणार की नाही असा मुद्दा नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत चर्चेला गेल्याने अखेर हिंजवडी ग्रामपंचायतीने रविवारी (दि. 18) धडक कारवाई करीत व्यावसायिकांना नव्याने उभारलेल्या मंडई आवारात स्थलांतरित केले.
या वेळी कारवाईस आयटीनगरीचे सरपंच मच्छिंद्र हुलावळे, माजी सरपंच शिवनाथ जांभुळकर, विशाल साखरे, सचिन जांभुळकर, संदीप साखरे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, लिपिक व पोलीस यांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करून काही व्यावसायिकांना मंडई आवारात स्थलांतरित केले. त्यामुळे हिंजवडीतील मुख्य रस्ता मोकळा झाला आहे.
ग्रामस्थांच्या प्रश्नानंतर प्रशासन जागे
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत आयटीतील प्रमुख रस्त्यांवर व गावठाणातील महापालिका हद्दीतील रस्त्यांवर अतिक्रमण करून रस्ता गिळंकृत करणाऱ्या व वाहतूक समस्येत भर घालणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत दै “प्रभात’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून ग्रामपंचायत व एमआयडीसी प्रशासनावर ताशेरे ओढले होते.
प्रशासनाकडून कारवाई
प्रभातच्या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने रविवारच्या आठवडे बाजाराचा मुहूर्त साधून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या या मोहिमेचे कौतुक होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ही लोकाभिमुख कामांची तत्परता कायम दाखवावी, सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे. याबाबत वसंत साखरे म्हणाले, प्रशासनाने मनावर घेतल्यावर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. परंतु त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय हवा असतो.