पाटण – कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारंवार पाण्याखाली जाऊन नुकसान झालेल्या मुळगाव पुलाच्या डागडुजीला सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला. दैनिक प्रभातने दि. 4 ऑगस्टच्या अंकात “मूळगावचा पूल मोजतोय अखेरच्या घटका’ अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेत पुलावरील खड्डे मुजवून रोलिंग तसेच रेलींगचेही काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पाटणच्या दक्षिणेकडील बाजूस जोडणाऱ्या मुळगाव पूल दळणवळणासाठी महत्त्वाचा मानला जातो. पुलापलीकडे त्रिपुडी, बेलवडे, चोपडी, मुळगाव आदी गावांच्या पाटणला जवळच्या संपर्कासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे मुळगाव पूल नेहमी पाण्याखाली जातो. यामुळे नदीपलीकडील गावांचा पाटणशी जवळच संपर्क तुटतो. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर मुळगाव पुलावरून पाणी जाऊन पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
पूलाचे कॉंक्रिटीकरण पुराच्या पाण्याने खराब होऊन पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. तर पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या लाकडांमुळे पुलाचे रेलिंग ही खराब झाले होते. यासाठी सर्वप्रथम ‘प्रभात’ने या पुलाच्या बांधकामासाठी आवाज उठवला होता. त्यानंतर बांधकाम विभागाने अखेर या पुलाची डागडुजी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या आठ दिवसांपासून या पुलाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. त्यानुसार पुलावरील कॉंक्रिटीकरण नव्याने करण्यात आले आहे. ज्याठिकाणी रेलिंग खराब झाले होते. ते पूर्णपणे बदलण्यात आले असून सध्या कलर चे काम चालू आहे.
नव्या पुलासाठी प्रयत्न होणे गरजेचे
पाटणच्या दक्षिण विभागाशी जोडणाऱ्या मुळगाव पुलाची उंची कमी असल्याने वारंवार हा पूल पाण्याखाली जाऊन नदीपलीकडील गावांचा संपर्क सुटतो.म त्यामुळे नागरिकांना नवारस्ता मार्गे पाटणला यावे लागते. तर वारंवार पाण्याखाली जाऊन या पुलाचे नुकसान झाले असून पिलर कमकुवत झाले आहेत. त्यामुळे अद्याप या पुलाचा धोका कायम आहे. त्यामुळे मुळगाव येथील नदीवर जास्त उंचीचा नवीन पूल उभारण्याची गरज आहे.