पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “महाजनादेश यात्रा’ पुण्यात फक्त 3 तासांसाठीच येणार असल्यामुळे इतक्या कमी वेळात ही यात्रा आठही मतदार संघांत फिरविताना शहरातील भाजप नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “महाजनादेश यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात येत्या 14 सप्टेंबरला ती पुण्यात येणार आहे. त्यानंतर ती भोर, वाई मार्गे सातारा येथे जाणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने शहरातील आठही आमदार व इच्छुकांनी शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे; पण यात्रेचा पुण्यातील कालावधी पाहता शक्तीप्रदर्शन कसे करायचे तसेच आपल्या मतदारसंघात “महाजनादेश यात्रा’ कशी जास्त वेळ फिरवायची याबाबत सर्वांची चढाओढ सुरू आहे. महाजनादेश यात्रेचा फायदा मिळवून घेण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आहेत. या यात्रेमुळे आपल्या मतदार संघात वातावरण निर्मिती होईल आणि त्याचा फायदा आगामी निवडणुकीसाठी मिळू शकेल, असा अंदाज असल्याने सगळी धावपळ सुरू आहे.
या यात्रेचा कालावधी पाहता आठही मतदार संघांत फिरणे सध्या तरी अवघड दिसत आहे. ती सोलापूर रस्त्याने उरळी कांचन मार्गे पुण्यात येणार आहे. पुण्यात येण्याची यात्रेची अधिकृत वेळ सायंकाळी 5.30 वाजताची असणार आहे. म्हणजे ती साधारण सहापर्यंत पुण्यात येईल, त्यानंतर अवघे तीनतास ती पुण्यात फिरणार आहे. म्हणजे नऊ वाजेपर्यंतचा कालवाधी असणार आहे.
या 3 तासांत नक्की कुठल्या मतदार संघात जायचे आणि सभा घ्यायची की नाही जर सभा झाली तर ती कोणत्या मतदार संघात घ्यायची याबाबतचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. याबाबत काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता महाजनादेश यात्रा फार कमी वेळ पुण्यात असल्याने नियोजन करण्याचे काम सुरू आहे. लवकरच तयारी पूर्ण होईल, त्याचबरोबर कुठेही मोठी सभा आयोजित नकरता रथावर पाच ते दहा मिनिटांचे भाषण ठेवावे, असा सुद्धा प्रयत्न सुरू आहे.
वेळेची मर्यादा पाळावी लागणार
शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात मुक्कामी असले तरी दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी (15 सप्टेंबर) भोर मार्गे वाई, सातारा येथे ही यात्रा जाणार आहे. मुक्काम जरी पुण्यात असला तरी यात्रा शहरात फिरविताना वेळेची मर्यादा पाळावी लागणार आहे. रात्री नऊ किंवा फार तर साडेनऊ वाजेपर्यंत यात्रा शहरात फिरू शकते म्हणजे अवघ्या तीन ते साडेतीन तासांत सगळे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला आहे.