राजेंद्र वारघडे
पाबळ – सध्या सत्तेच्या हव्यासासाठी राजकीय क्षेत्रात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ईडीची गाडी मात्र मंत्र्यांच्या दारात सुसाट जात असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मात्र चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांच्या अटकेने हा कार्यक्रम फायनल पर्यंत गेला आहे. हे युद्ध लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत सुरूच राहणार की निवडणुकीपूर्वीच थांबणार याकडे मात्र सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधकांच्या कुरघोड्यांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना मात्र थारा मिळत नसल्याचे दिसून येत असल्याची चर्चा सध्या गावागावांत सुरू झाली आहे.
राजकीय बेभान धुमश्चक्रीत भाजप आणि तमाम उर्वरित पक्ष हिरीरीने भाग घेत असल्याचे दिसून येत असले तरी त्याची खरी लढाई तळागाळातून निकराने सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामागे सत्ताकारण असले तरी दोन्ही बाजूंनी दिले जाणारे शह प्रतिशह राजकारणाची दिशा भरकटली गेल्याचे सूचित करत आहे. या बाबीचीच दखल जनतेकडून गंभीरपणे घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.
कुरघोड्यांच्या लढाईत, एक गट शांतपणे मिळालेल्या अधिकाराचा वापर करून राजकीय दृष्ट्या अनेकांना गारद करण्याचे काम करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला आम्ही सत्यवादी आहोत, असे सांगत सत्तेचा गैरवापर होतौय असा टाहो फोडत आहेत. या सर्व तणावामागे भाजपला महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्याचे दुःख आहे. तर केव्हाही सरकार पडू शकते. या स्वप्नांना विराम द्यावा लागल्याचे शल्य आहे. भाजप काही करू शकत नाही याची सल आहे,
त्यामुळेच या सर्वांना नामोहरम करण्याचा अखेरचा पर्याय राबवला जात आहे. त्रिपक्षीय शासन चालवताना, तडजोडी करताना धुसफुस सांभाळताना तिन्ही पक्ष हवालदिल झाले असल्याचे दिसून येत आहे. तरीही केवळ भाजपच्या आक्रमी भूमिकेमुळे त्रिपक्षीय सरकार कार्यकाळ पूर्ण करण्याकडे वाटचाल करीत असल्याचे सत्य पुढे येत आहे, त्याचवेळी भाजपला प्रतिकार करताना या तिन्ही पक्षांनीसुद्धा जनतेला गृहीत धरल्याने जनमनात मात्र निराशा येत असल्याने राजकीय युद्धखोर पुन्हा प्रवाहात येणार नाहीत याची जनताच काळजी घेण्याची दाट शक्यता आहे.
निवडणुकीत परिणाम उमटण्याची शक्यता
विशेष म्हणजे ज्या नेतृृत्त्वाचे एकखांबी बळावर भाजपचा तंबू विद्यमान परिस्थितीत शिस्तीत चालताना दिसत आहे. देशाचे प्रथम नागरिकही या प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलनातून पुढे आले आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी मोडून पडतील अशी अपेक्षा ठेवून आंदोलन तेवत ठेवले होते. मात्र शेतकरी हटत नाही असे पाहून व जनतेत वेगळा संदेश जातोय हे पाहून सपशेल माघार घेऊन शेतकरी कायदे रद्द केल्याची घोषणा केली असली तरी त्याचे परिणाम प्रत्येक निवडणुकीत उमटणारच अशी चर्चा आहे.