कराड (प्रतिनिधी) – करोना संसर्गजन्य रोगाच्या साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व कृषी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतकरी गटामार्फत बांधावर खते व निविष्ठा पोहोच करण्यात येतील, अशी माहिती कराड तालुका कृषी अधिकारी आर. एन. मुल्ला यांनी दिली.
करोना संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने खरीप हंगामातील नियोजन संदर्भात मंडल कृषी विभाग उंडाळे (ता. कराड) यांच्यावतीने शेतकरी अधिकारी यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतकरी गटामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते देण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी आपली नावे शेतकरी गटाकडे नोंदवावीत व त्या पद्धतीने खरीप हंगामात लागणारे बियाणे व खतांची नोंद घेता येईल. आत्मा योजनेअंतर्गत विभागात गट नोंदणी झाली असून या गटाकडे शेतकऱ्याने आपली मागणी गटप्रमुखाकडे नोंदवावी. म्हणजे सेवा केंद्रातून एकत्रित खत बियाणे उचलून त्याचे शेतकऱ्यांना समन्वयाने वाटप करणे शक्य होईल. याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधावा. कृषी अधिकारी बी. बी. तोरणे यांनी विभागात म्हासोली येथील शेतकरी गटाने 10 टन, ओंडोशी गटाने पाच टन बियाणे पुरवठा करण्याची तयारी दर्शवल्याचे सांगितले.
—–