आयुष्यात आपलं दैनंदिन जीवन जगण्याच्या स्वतःच्या अनेक नावीन्यपूर्ण कल्पना आपल्या मनात असतात. प्रत्येकालाच असं वाटत असतं की, आपलं आयुष्य इतरांपेक्षा निराळं असावं. जगानं कौतुक करावं असंच आपलं जीवन असावं, आपल्या प्रत्येक बाबतीत काही-ना-काही वेगळेपण असावं. इतरांपेक्षा मी, माझी प्रत्येक गोष्ट भिन्न असावी, त्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. आपल्यापैकी अनेकांना त्यांच्यात असलेल्या उणिवांच्या जाणिवाच होत नाहीत. खरं तर, आपल्यातील उणिवा दूर करून जाणिवा जपण्याची आवश्यकता असते आणि जपलेल्या जाणिवांना नेणिवेपर्यंत घेऊन जाण्याची जरुरी असते, हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. अनेकजणांना आपल्यात उणिवा आहेत हे जाणूनच घ्यायचं नसतं, मान्य नसतं. बदलत चाललेल्या जीवनमूल्यांचा स्वीकार करावा लागतो, हे आपण प्रत्येकानं अभ्यासपूर्वक समजून घेणं गरजेचं असतं. ती जीवनमूल्येच आपल्याला आनंदानुभूतीची प्रचिती देत राहतात.
शंकरराव पत्नीच्या निधनानंतर अगदीच एकटे पडले होते. मोठा मुलगा, सून आणि नातवंडे परदेशात स्थायिक झाले होते. मुलगी, जावई आणि नातवंडे सुदैवानं त्यांच्या घरापासून जवळच राहात होते. शंकरराव वयाच्या बाहत्तराव्या वर्षी देखील स्वतःची तब्येत सांभाळून होते. रोज सकाळी चालण्याचा व्यायाम, योगा, योगासने सर्व नित्याचाच नियम होता. एकही दिवस त्यांना त्यांच्या दिनचर्येत बदल झालेला मान्य नसे. जेवण-खाण्याच्या वेळा देखील त्यांनी कटाक्षानं पाळल्या होत्या. ह्याच कारणाने त्यांना कोणत्याही स्वरूपाचं दुखणं नव्हतं आणि कोणत्याही औषधांची देखील जरुरी नव्हती. वाचनाची आवड असल्यामुळे दिवसभरात पुस्तकांना हात लावला नाही असं त्यांच्या बाबतीत कधीच होत नव्हतं. दिवसेंदिवस त्यांच्या शारीरिक एकटेपणा आणि मानसिक एकलेपणाची त्यांना स्वतःला काळजी वाटायला लागली होती. त्यांच्या मुलाच्या कुटुंबीयांची भारतात येऊन वडिलांच्या सोबत राहण्याची तयारी नव्हती आणि शंकररावांना मुलाकडे परदेशात जाऊन स्थायिक होण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर मुलीने तिच्या घरी घेऊन जाण्याचा अनेकदा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. शंकररावांना जावयाच्या घरी जाऊन राहणे देखील मान्य नव्हते.
दिवसभर शंकररावांच्या दैनंदिन उपक्रमांतर्गत धार्मिकतेमुळे अनेक पोथी वाचन, पारायण वगैरे देखील सुरू असे. स्वयंपाक करण्यासाठी एक मावशी येत असत, त्यामुळे दोन्हीवेळा त्यांच्या आहाराच्या शिस्तीत त्यांचं जेवण-खाण होत असे. काही काळापासून त्यांना मानसिक एकलेपण जाणवायला लागलं होतं. त्यावर देखील त्यांच्याकडे उपाय होता. जेव्हा कधी त्यांना असं वाटायचं तेव्हा मनमुरादपणे मोबाइलवर गाणी ऐकत त्याचा आनंद घेत असत. त्यांच्या दृष्टीनं सुख हे भोगण्यापेक्षा समजण्यात अधिक असतं, ह्याची जाणीव सतत ठेवणं जरुरीचं असतं. एखादी गोष्ट आपल्याजवळ नसल्यावर आपण दु:खी होऊन ती मिळवण्याच्या मागे लागतो. ज्याक्षणी ती मिळते तो खरा सुखाचा क्षण, असा प्रत्येकाचा समज असतो. लगेच पुढच्या क्षणाला त्या गोष्टीची ओढ संपते; नवीन एखाद्या गोष्टीची ओढ लागायला सुरुवात होते. ती नवीन गोष्ट मिळवण्यासाठी पुन्हा केविलवाणी धडपड सुरू होते. ती मिळेपर्यंत पुनःपुन्हा आपण दु:खी होत राहतो. शंकरराव म्हणतात, व्यवहारात येणारी संकटं आणि समस्या निवारणासाठी जे वेगळं रसायन लागतं, त्याला मित्र म्हणतात. ऐन वैशाखात वर्षा ऋतूची शाश्वती आणि गारवा फक्त मित्रच देतो. कसलेही हिशेब न ठेवता जो गणिताप्रमाणे शाश्वत नेमकेपणा देतो, तो मित्र. म्हणून मी मैत्री केली त्या मित्राशी, अर्थात आत्मविश्वासाशी, तुम्ही देखील करा मैत्री त्याच्याशीच. आत्मविश्वासच आपल्या अंतरंगात आनंद निर्मिती करत असतो. सध्या अनेक वयोवृद्धांच्या जीवनात असे प्रसंग येत असल्याचं समजतं. त्यांच्या शारीरिक एकटेपणापेक्षा देखील मानसिक एकलेपणाची भावना बळावत चालल्याचं दिसून येत आहे. अनेकदा दोन पिढीतील अंतर, आपापसातील समजूतदारपणा, मूळ स्वभाव, व्यक्तीचा पिंड अशा अनेकविध कारणांमुळे तसंच प्रत्येच व्यक्तीच्या त्या त्या विषयाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला चांगले वाईट अनुभव येत असतात. वरील घटनेत नेमकं कोण जबाबदार, असं विचारलं तर अनेकांच्या उत्तरांमध्ये मतभिन्नता दिसून येईल. ह्यामध्ये जबाबदार कोण असू शकते, हा विचार करण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत प्रत्येकानं स्वतः आनंदी राहून इतरांना देखील आनंद देत राहावे. अनेकजण परिस्थितीला, नशिबाला, परमेश्वराला दोष देतात. आपल्या आयुष्यात जगण्यापलीकडच्या जीवनात आत्मिक आनंदाभूती प्राप्त करणं महत्त्वपूर्ण असतं.
विद्यानंद