मला स्वतःला लिहायची फार आवड आहे. आपण खूप खूप पत्रे सर्वांना पाठवावीत आणि त्या सर्वांनी त्यांची खूप खूप उत्तरे मला पाठवावीत म्हणजे मग आपल्या जवळच्या किल्लीनं आपल्याला टपालपेटीचं कुलूप काढून त्यातली आलेली खूप खूप पत्रे घेऊन छान वाचू यात असं माझं लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं.
आमच्या लहानपणी प्रत्येकाची अशी टपालपेटी नसायचीच. खाकी कपड्यातला पाठीवर तशीच मळकट रंगाची पत्रांनी भरलेली धोपटी टाकून पोस्टमन प्रत्येकाच्या घरी येऊन पत्रे देत असे. मी शाळेमध्ये असताना माझी एक श्रीमंत मैत्रीण होती. त्यांच्या मोठ्या बंगल्याबाहेर त्यांची स्वतःची अशी एक टपालपेटी होती. पोस्टमन त्यांची पत्रे त्या बंद टपालपेटीत टाकायचा. आमच्याकडे कसा बेल किंवा दाराची कडी वाजवून पत्रे द्यायचा तसं द्यायचा नाही तर अगदी अदबीनं त्या टपालपेटीत टाकायचा. मग मैत्रिणीच्या घरचं कुणीतरी ती टपालपेटी उघडून त्यात आलेली खूप खूप पत्रे तिच्या वडिलांना आणून द्यायचे. तिचे वडील उद्योगपती होते त्यामुळे त्यांना पत्रेही रोज खूप येत असत. हे सारं मी तिच्याकडे गेले की नेहमी बघायची. अशी खूप पत्रे टपालपेटीत येऊन पडणं म्हणजे मला खूपच चैनीचं वाटायचं. त्यामुळे कधी कधी मैत्रिणीचा खूप हेवा पण वाटायचा. त्यामुळे तेव्हापासून ती बंद टपालपेटी माझ्या स्वप्नात जाऊन बसली होती.
मधल्या काळात बैठी घरं उठून आभाळात उंचउंच होत गेली. लोक जमिनीवरून आभाळातल्या मजल्यांवर राहायला गेले. मग एवढ्या मजल्यांवर एवढ्या जणांकडे चढून जाऊन पत्रं देणं पोस्टमनांना अशक्य होऊ लागलं. त्यामुळे प्रत्येक गगनभेदी इमारतींच्या तळमजल्यावर त्या इमारतीत राहणाऱ्या प्रत्येकाच्या नावाची आणि मालकीची एकेक टपालपेटी आली. त्यांना कुलुपे आली. नि माझ्या स्वप्नातली ऐष प्रत्येकजणाचीच झाली. आमच्या नावाची पण एक कुलुपबंद टपालपेटी आली नि तिच्या दर्शनानं मी खरंच खूप सुखावून गेले.
मी रोज ऑफिसमधून येताना ही कुलूपबंद टपालपेटी माझ्या जवळच्या किल्लीनं थाटात मोठ्या आशेनं उघडते. निरनिराळे क्लासेस, प्रवास कंपन्या यांच्या जाहिराती. मंगल कार्यांची निमंत्रणं, इथपासून निरनिराळी बिलंच काय, पण निवडणुकांच्या काळात प्रत्येक राजकीय पक्षांच्या उमेदवारांचं म्हणणं काय आहे ते सांगणारे खलिते पण या बंद पेटीत येऊन पडतात. कधीतरी एखादं पत्र असतं एरवी जाहिराती बिलं नि पाक्षिकं पडलेली असतात.
काय झालंय की टेलिफोन, एस.एम.एस., ई-मेल या साऱ्यांमुळे लोक हळूहळू पत्रं लिहायला विसरूनच गेले आहेत. कारण पत्रांपेक्षाही कमी वेळात आपण आपल्या प्रिय व्यक्तींशी हल्ली संपर्क साधू शकतो. त्यामुळे पत्रलेखन आता इतिहासजमा होतंय. असं वाटतंय. कारण रोज खूप वेगानं धावणाऱ्या आपल्या या जगात एका जागेवर बसून कागदावर काळं पांढरं करायला देखील कुणाला वेळ नाही. त्यामुळेच पत्रलेखनाची एकेकाळची कलादेखील गुलदस्त्यात जाऊन बसलीय आणि त्यामुळे माझी स्वप्नातली कुलुपबंद टपालपेटी देखील बिच्चारी झालीय.
उमा अनंत जोशी