पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी नियोजन संदर्भात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि ट्रस्ट यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. त्याबाबत पुढील दहा दिवसांत शासनस्तरावर बैठक होणार असून, त्यामध्ये सर्वांच्या सहमतीने पालखी सोहळ्यासंदर्भात अंतिम निर्णय होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शासन स्तरावर बैठक होणार असून त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला अनुसरून चांगला निर्णय होईल, अशी अपेक्षा म्हैसकर यांनी व्यक्त केली. काही पालख्या दि. 26 किंवा 27 मे रोजी आळंदी अथवा देहू कडे निघतात, या पालख्या निघण्यापूर्वी निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
दरम्यान, संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा मेमध्ये सुरू होतो. तर राज्यभरातून शेकडो दिंड्यासह लाखों भाविक श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. मात्र, यंदा करोनाचे संकट असल्यामुळे काही मोजक्याच व्यक्तींना घेऊन हा पालखी सोहळा करावा, याबाबत प्रशासन आणि सोहळा प्रमुखांशी चर्चा सुरू आहे.