पुणे- यंदा फेब्रुवारीत देशाच्या काही भागांत तापमानाच्या पाऱ्याने 40 अंशांना स्पर्श केला. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, मागच्या 30 वर्षांत फेब्रुवारीत कमाल तापमान हे 28 अंश सेल्सिअसच्या आसपास, किमान तापमान हे 15 अंशांच्या आसपास राहायचे. पण, देशाच्या बहुतांश भागांत हे तापमान चाळिशीजवळ गेल्याने भीतीचा गोळा आहे.
फेब्रुवारीत राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्य सर्वाधिक उष्ण ठरली. काही ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये तुलनेने थंड वातावरण असले, तरी तेथेही 10 ते 11 अंश सेल्सिअसने तापमान अधिक नोंदविले गेले आहे. तापमानाची अशी असामान्य स्थिती “उष्णतेची लाट’ म्हणून वर्णन करण्यास पात्र ठरते, असे अभ्यासक सांगत आहेत. तर, उत्तर आणि पश्चिम भारतातील बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा 5 ते 11 अंशांनी जास्त नोंदवले गेले आहे.
यंदाचा उन्हाळा असणार अधिक तापदायक
यावर्षी उन्हाळ्यात राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने मंगळवारी हा अंदाज वर्तवला आहे. मार्च ते मेदरम्यान पूर्व व मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि पूर्वोत्तर राज्यांत या हंगामात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक असणार आहे. तसेच किमान तापमानातही वाढ होणार असून दक्षिण भारतातील काही राज्य वगळता पूर्ण भारतात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक असणार आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळा अधिक तापदायक असणार आहे. मार्च ते मेदरम्यान मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारतातील काही राज्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मार्च महिना मागच्या दोन वर्षांपेक्षा अधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे. मार्च ते मे या कालावधीत उत्तर पश्चिम भारत आणि पश्चिम मध्य भारतात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.