– संजोक काळदंते
मानवी वस्तीत बिबट्याचा वावर ही गंभीर समस्या बनत चालली आहे. वाढत्या जंगलतोडीमुळे भक्ष्य मिळणे कठीण झाल्याने बिबटे मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत, हे वास्तव आता सगळ्यांच्याच समोर आले आहे. जुन्नर तालुक्यातील काही भागांत अलीकडच्या काळात बिबट्यांचा वावर वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सध्या तालुक्यातील काही गावांत बिबटे फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. हल्ले कमी झाले असले तरी त्यांचा वावर चिंताजनक ठरतो आहे. ग्रामस्थांकडून मागणी आल्यावर त्या-त्या गावांच्या परिसरात पिंजरे लावण्यात येत आहेत. तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात सध्या बिबट्या आपल्या पिलांसह फिरत असल्याचा व्हीडीओ सध्या समाज माध्यमांद्वारे सगळीकडे फिरत आहे. हिरवेतर्फे नारायणगाव आणि मांजरवाडी या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून 8 शेळ्या फस्त केल्याची घटना गुरुवारी (दि. 15) घडली आहे.
याबाबत वनपरिमंडल अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पंचनामाही केला आहे. मात्र या घटना घडत असूनही बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्याबाबत गांभीर्याने पाहिले जात आहे, असे दिसून येत नाही. जुन्नर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांच्या रोखण्या बाबतीत, तसेच बिबट संख्या नक्की किती आहे, त्यांची गणना याबाबत वनविभाग उदासीन असल्याचे चित्र समोर येत आहे. वनविभाग याबाबत पुढील नियोजनानुसार काय उपाय योजना करणार आहे, याबाबतही कोणताही अहवाल अजूनही सादर केला गेलेला नाही.