नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याच्या चीनने घातलेला घाट आणि हा हट्ट ते कायम ठेवण्याची भीती आहे. त्यामुळे पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये असणारा तणाव वाढला आहे. त्यातच चीनने सीमेजवळ बांधकामे सुरू केली असल्याने या तणावात भर पडण्याची शक्यता आहे.
तणावाची स्थिती असणाऱ्या फिंगर चार जवळ चीनने हेली पॅड उभारली आहेत. त्याचवेळी पॅनगॉंग टीसो तलावाच्याच्या दक्षिण किनाऱ्यावरील आपल्या फौजेतही चीनने वाढ केली आहे.
दरम्यान भारताने चीनला सीमा रेषा बदलण्याच एकतर्फी प्रयत्न हा दोन्ही देशातील संबंधांवर परिणाम करू शकतो, असा कडक इशारा दिला आहे. या हेलीपॅडसह अन्य बांधकामे या भागात चीनने गेल्या आठ आठवड्यात केली आहेत.
याबाबत भारताला गाफील ठेवण्याची रणनीती चीन पुर्वापार वापरत आला आहे. प्रत्यक्ष चर्चेत चीन सीमेवरील सैन्य कमी करण्यास मान्यता देते. मात्र तसे काही केल्याचे दिसत नाही.
एप्रिलप्रमाणे स्थिती ठेवण्यास त्यांनी मान्यता दिली नाही, हे महत्वाचे आहे. भारतानेही या भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे.
या भागात असणाऱ्या नैसर्गिक अडथळ्यांमुळे तातडीने सैन्य वाढवता आले नाही, तरी भारताने चीनी सैन्याएवढेच सैन्य सीमेवर तैनात केले आहे.