नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील लखनौ-गोरखपूर महामार्गावर खासगी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भयंकर होती की ट्रक उलटून बसच्या वर पडला. त्यामुळे बसचा पुरता चक्काचूर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये लखनऊ-गोरखपूर महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रक उलटा होऊन बसच्या वर पडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Uttar Pradesh | At least 12 people injured in a collision between a passenger bus and a truck on the Lucknow-Gorakhpur highway in Ayodhya pic.twitter.com/l7MvdSHCQZ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 21, 2023
या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. बस आणि ट्रकखाली अनेक जण अडकले. क्रेनच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. अनेकांचा जागीच मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात गेल्यानंतर मृत्यू झाला. त्याचबरोबर जखमींना विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचावकार्यासाठी एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी बस लखनौहून येत होती. ती वळणार असतानाच गोरखपूरहून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. ट्रकचा वेग खूप होता. मात्र, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन भीडली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील काही प्रवाशी बाहेर फेकल्या गेले, त्यातील काही जण ट्रकखाली दबले.