पुणे – वाहनचालकांचा टोल नाक्यांवरील वेळ वाचावा आणि टोल नाक्यांवरील यंत्रणा सुलभ व्हावी, यासाठी केंद्र सरकारने वाहनांना “फास्टॅग’ अनिवार्य केले. पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर “फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित केली असूनही, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे हे “फास्टॅग’ नव्हे तर “स्लो टॅग’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वाहनचालकांनी “फास्टॅग’ची अंमलबजावणी केली. “फास्टॅग’मुळे तरी टोलनाक्यांवरचा वेळ कमी होईल, अशी अपेक्षा होती. “फास्टॅग’ असणारे वाहन टोलनाक्यावर आल्यानंतर काही सेकंदात वाहनावरील “फास्टॅग स्टीकर’ स्कॅन होवून टोलचे शुल्क वजा होणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही अनेक टोलनाक्यांवर सक्षम यंत्रणा नसल्याने वाहनांच्या रांगा आहेत. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
टोल बुथवर ऑपरेटर नसणे, बुथ बंद असणे, तांत्रिक अडचणी, फास्टॅग स्कॅन न होणे, वाहनचालकांशी वाद आदीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. प्रामुख्याने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी टोलनाक्यांवर अधिक गर्दी असते. यापूर्वी अनेकदा काही किलोमीटरच्या रांगा देखील येथे लागल्या आहेत. टोल प्रशासनाच्या दुर्लक्ष करण्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना वाहनचालकांनी दै. “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे “फास्टॅग’ असूनही रांगेत उभे राहावे लागत असल्याने “फास्टॅग’चा उपयोग काय, असा सवाल वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत खेड शिवापूर टोलनाक्याचे रुट मॅनेजर अभिजित गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नागरिक किमान बॅलन्स ठेवत नसल्यामुळे टॅग ब्लॅक लिस्टमध्ये जातो. फास्टॅग रिचार्ज केलेले नसतात. त्यातील रक्कम अपुरी असते. नागरिकांना याबाबत पुरेशी माहिती नाही. या काही कारणांमुळे फास्टॅग स्कॅन होण्यास वेळ लागतो. त्यामुळे काही वेळा 2 ते 3 वाहनांचे “वेटींग’ असते. मात्र आता लांब रांगा लागत नाहीत. त्यांच्या “फास्टॅग’मध्ये अडचणी नाहीत, अशांचे टॅग तातडीने स्कॅन होतात, असे त्यांनी सांगितले.
मी सकाळी 6:15 च्या दरम्यान खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर होतो. आठपैकी चार टोल बुथ ऑपरेटरअभावी बंद असल्याने सकाळच्या वेळात देखील वाहनचालकांना किमान 10 मिनिटे उभे राहावे लागत होते. सामान्यांना फास्टॅगची सक्ती आणि कंत्राटदाराला मनमानीसाठी मोकळीक, अशी स्थिती आहे. याबाबत मी “एनएचएआय’कडे तक्रार दाखल केली आहे.
– विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते