सातारा – आनेवाडी टोल नाका आणि पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोल नाका या टोलनाक्यांवर फास्टटॅग यंत्रणेचा लेट लतीफ कारभार सुरू आहे. गाडी टोल नाका ओलांडून गेल्यानंतर चक्क दोन दिवसांनी पैसे कट झाल्याचे मेसेज वाहन चालकांच्या मोबाइलवर पडत आहेत. याशिवाय गाडी टोल नाक्यावर गेलेली नसतानाही पैसे कट होण्याच्या प्रकाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वाहनचालकांना विनाकारण भुर्दंडाचा मनस्ताप होत आहे.
यासंदर्भात रस्ते महामार्ग प्राधिकरणाने “टेक्निकल एरर’ म्हणत या विषयावर भाष्य करण्याचे टाळले आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यामध्ये तासवडे आणि आनेवाडी व पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर हे तीन टोल नाके कार्यान्वित आहेत. आनेवाडी टोल नाक्यावर 75 तर खेड शिवापूर टोल नाक्यावर 110 रुपये रिटर्नचे घेतले जातात. मात्र, सध्या रस्ते विकास महामंडळाचा ऑनलाइन कारभार लेट लतीफ सुरू आहे. फास्टटॅगचे पैसे कट झालेत की नाहीत हे वाहन चालकांना अजिबात समजत नसल्याने वाहन चालक गोंधळून जात आहेत.
साताऱ्यातील श्रीकांत बंडगर या प्राध्यापकांना गाडी टोल नाक्यावर दोन दिवसांपूर्वी गेल्यानंतर 48 तासांनी पैसे कट झाल्याचा मेसेज आला. बंडगर यांना काही महिन्यांपूर्वी गाडी आणि आनेवाडी टोलनाक्यावर गेलेली नसताना सुद्धा फास्टटॅगमुळे त्यांच्या ई वॉलेटमधून पैसे कट झाल्याचा मेसेज आला होता. या तांत्रिक घोळासंदर्भात रस्ते विकास महामंडळाकडे खुलासा मागितला असता अजूनही त्याच्यावर स्पष्टीकरण मिळालेले नाही.
रस्ते विकास महामंडळाच्या वारजे माळवाडी येथील तांत्रिक विभागाचे प्रमुख अमित यादव यांच्याशी संपर्क साधला असता सध्या सॉफ्टवेअर प्रणालीचे विस्तार आणि अद्ययावतीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अशा तांत्रिक अडचणी होऊ शकतात. मात्र, गाडी टोल नाक्यावर गेलेली नसतानाही पैसे कसे कट होतात या प्रश्नाचे उत्तर मात्र यादव देऊ शकले नाहीत. बऱ्याच वाहन चालकांना असे मनस्तापजनक अनुभव येत आहेत. या फास्टट्रॅक यंत्रणेच्या अंमलबजावणीचे सुसूत्रीकरण व्हावे, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.