नवी दिल्ली – भारतामध्ये फास्टॅग मार्फत टोल वसुली सुरू केल्यानंतर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होऊन वेळ वाचत आहे. तसेच जलदपणे टोल वसुली देखील होत आहे. फास्टॅगद्वारे करण्यात आलेल्या टोल वसुलीने विक्रमी महसूल मिळवला आहे. मागील आठवड्यात म्हणजेच, शनिवार दी. 29 एप्रिलला एका दिवसात फास्टॅगद्वारे विक्रमी 193.15 कोटींचा टोल वसूल करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.
सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये फास्टॅग अनिवार्य केल्यापासून फास्टॅग टोल प्लाझाची संख्या 770 वरून 1228 पर्यंत वाढवली असून यात 339 राज्य टोल प्लाझांचा समावेश आहे. फास्टॅगने संपूर्ण भारतातील 50 हून अधिक शहरांमध्ये 140 पेक्षा जास्त वाहनतळांवर पार्किंग शुल्कासाठी फास्टॅगचा वापर सुरू केला आहे असे NHAI ने म्हटले आहे.
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट योजनेनंतर देशातील टोल होणार बंद !
देशातील अधिक सुरळीत टोल प्रणालीसाठी राबवण्यासाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट उपग्रह स्थापित करण्याची योजना राबवली जाणार आहे. या योजनेनंतर टोल प्लाझा बंद होणार असून आपल्या वाहनाने किती अंतर कापले यावरून टोल वसूल करण्यात येणार आहे. सॅटेलाइट नेव्हिगेशन टोलिंग सिस्टिम ही नवी यंत्रणा लागू करण्यासाठी केंद्र सरकारने चाचण्या सुरु केल्या आहेत. त्यात देशभरातील 1 लाखांहून अधिक वाहनांचा समावेश असणार आहे.