परळी – पावसाअभावी राज्यातील विविध भागांतील शेती पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी चिंतेत आहेत. अशातच राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील परळी तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बालाजी ज्ञानोबा ढाकणे (वय 45, रा. वैजवाडी, तालुका परळी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. 30) सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी बालाजी ढाकणे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची दोन एक्कर शेती आहे. शेतीमध्ये त्यांनी सोयाबीन पीक घेतले आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे पिक वाळून जात आहे. सततची नापिकी, डोक्यावर असलेलं कर्ज कसं फेडणार या विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
दरम्यान, तलाठी विष्णू गिते, पोलीस कर्मचारी घरत, तोटेवाड, गित्ते यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. मयत शेतकरी ढाकणे यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कृषी मंत्र्यांच्याच तालुक्यात शेतकरी आत्महत्या झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.