मुंबई – नोव्हेंबर महिन्यात राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्या ४ वर्षातील ही सार्वधिक आकडेवारी आहे. यासंबंधीचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिली आहे.
दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी गारपीट आणि महापूर अशा नैसर्गिक संकटांचा सामना शेतकरी करत आहे. यामुळे राज्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने हाताशी आलेलं पिक गेलं. शेतकऱ्यांचे पीक ७० टक्के खराब झाले. त्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले. २०१८ मध्ये ऑक्टोंबर-नोव्हेंबरच्या दरम्यान झालेल्या आत्महत्येच्या घटनांपेक्षा २०१९ मध्ये या काळात ६१ टक्के वाढ झाली.
नोव्हेंबरमध्ये दुष्काळग्रस्त मराठवाडा प्रदेशात सर्वाधिक १२० आत्महत्या आणि विदर्भात ११२ घटना घडल्या आहेत. वर्ष 2019 मध्ये एकूण २५३२ आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे. तर सन 2018 मध्ये ही संख्या 2518 होती. यंदाच्या अतिवृष्टीमुळे जवळपास १ कोटी शेतकरी प्रभावित झाले आहेत. यापैकी ४४ लाख शेतकरी एकट्या मराठवाड्यातील आहेत.