वाढत्या दराचा दुग्ध व्यवसायावरही परिणाम
इस्लामपूर – गेल्या सहा महिन्यांत पशुखाद्याचे दर दुपटीने वाढल्याने पशुपालन व दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. तर पशुखाद्य दरवाढीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.
अलिकडे दहा ते पंधरा वर्षांमध्ये शेतीच्या जोडीला दूधधंदा आला. बघताबघता अनेक शेतकऱ्यांचा दुधाचा धंदा हाच मुख्य व्यवसाय बनला. जातिवंत दुधाळ जनावरे खरेदी करून या व्यवसायाला मोठे स्वरूप प्राप्त करून दिले गेले. निवारा शेड त्याचबरोबर मुक्त गोठा पद्धती, मिल्क मशीन, कडबा कुट्टी मशीन अशा भौतिक सुविधा करत मोठी गुंतवणूक शेतकऱ्यांनी या व्यवसायांमध्ये केली आहे.
जनावरांच्या चारा व्यवस्थापन बरोबर पशुखाद्य व्यवस्थापनही महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय अपेक्षित दूध उत्पादकता जनावरांकडून निर्माण करता येत नाही. त्यासाठी सरकी पेंड, गोळी पेंड, गहू भुसा, सुग्रास अशा अनेक पशुखाद्यांचा वापर केला जातो. मागील तीन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराने जनावरांचे मोठे विस्थापन करावे लागल्याने व चाऱ्याचे हाल झाल्याने दुभत्या जनावरांची दूध उत्पादकता घटली आहे. त्याच्या जोडीला पशुखाद्याचे दर वाढल्याने शेतकरी वर्ग दुहेरी या कात्रीत सापडला आहे. मोठ्या कष्टाने उभा केलेला हा व्यवसाय कोलमडण्याच्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.
दुधाच्या दरात वाढ न होता पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने या व्यवसायावर संक्रांत आली आहे. दहा दिवसाला मिळणारा दुधाचे बील पशुखाद्यावरच खर्च होत असल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. व्यवस्थापन, भांडवली खर्च हे सर्व अंगावर पडत असल्याचे चित्र आहे. हा व्यवसाय परवडत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.