विरोधी नगरसेवकांची निवेदनाद्वारे मागणी
कराड – स्वच्छ व सुंदर म्हणविणाऱ्या मलकापूरमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग लागले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांकडून फक्त बाहेरील रस्त्यांची स्वच्छता केली जाते. मात्र अंतर्गत गल्ली-बोळातील रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले दिसतात. या परिसरातही स्वच्छता ठेवली जावी, अशी मागणी विरोधी गटाच्या नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन नगराध्यक्षा नीलम येडगे यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संजीवनी दळवी उपस्थित होत्या. निवेदनावर अशोकराव थोरात यांच्यासह जयवंत घाडगे, मुकुंद माने, अण्णासो काशिद, अजित थोरात, भास्कर सोळवंडे, शंकर बेले, संतोष हिंगसे, प्रशांत गावडे, विक्रम चव्हाण, राजू मुल्ला, डॉ. अमोल मोठे, सौ. रुपाली उबाळे, सौ. सुनीता कदम, सूर्यकांत खिल्लारे, जमीर शेख, डॉ. सुषमा मोटे, सौ. एस. एस. साळुंखे यांच्या सह्या आहेत.
निवेदनातील माहिती अशी, मलकापूर, आगाशिवनगर, शास्त्रीनगर या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांमध्ये कचऱ्याचे ढीग प्लॅस्टिक पिशव्या सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेले दिसून येतात. पावसाचे पाणी गटारांमध्ये तुंबून त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यातून त्या पाण्यामध्ये डेंग्यू मलेरियासारख्या डासांची पैदास झपाट्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सध्या मलकापूरमध्ये डेंग्यू, मलेरिया सदृश 110 रूग्ण आढळले आहेत. यावर उपाययोजना होण्याची गरज आहे.
लोक स्वच्छतेअभावी आजारी पडत आहेत. पालिकेचे स्वच्छता करणारे कर्मचारी फक्त मुख्य रस्त्यांवरील स्वच्छता करताना दिसतात. गल्ली-बोळातील स्वच्छतेचा लवलेशही त्यात नाही. अशा मलकापूरला स्वच्छ व सुंदर म्हणावे का? साथीचे आजार बळावण्या आधीच संबंधितांनी त्यामध्ये लक्ष घालावे. अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.