Paytm Share: पेटीएम पेमेंट्स बँकेवर (पीपीबीएल) आरबीआयच्या कारवाईनंतर, देशातील प्रसिद्ध फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या One97 कम्युनिकेशन्स किंवा पेटीएमच्या समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे आता, देशभरातील किराणा दुकानदार ग्राहकांना पेटीएम वापरू नका असे सांगत आहेत. भारतातील सुमारे 42 टक्के किराणा दुकानांनी पेटीएमपासून दूर राहून इतर मोबाइल पेमेंट ॲप्स वापरण्यास सुरुवात केली आहे.
42 टक्के किराणा दुकाने पेटीएमपासून दूरावली –
‘किराणा क्लब’चा सर्वे गुरुवारी जाहीर झाला आहे. त्यानुसार, गेल्या आठवड्यात पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या निर्बंधांनंतर, भारतातील 42 टक्के किराणा स्टोअर्स पेटीएमपासून दूर गेले आहेत आणि त्यांनी इतर मोबाइल पेमेंट ॲप्स वापरण्यास सुरुवात केली आहे. या सर्वेक्षणात 5 हजार किराणा दुकानदारांशी किराणा क्लबतर्फे संवाद साधण्यात आला.
पेटीएमवरील विश्वास 68 टक्क्यांनी कमी –
किराणा क्लबच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 20 टक्के लोकांनी इतर पेमेंट ॲप्स वापरण्याचा त्यांचा मानस असल्याचे सांगितले. आरबीआयच्या कारवाईनंतर 68 टक्के भारतीय किराणा दुकानांचा पेटीएमवरील विश्वास उडाला आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. किराणा क्लबचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गुप्ता म्हणाले, “RBI ने लादलेल्या निर्बंधांमुळे किराणा स्टोअर्सना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, परंतु इतर अनेक पेमेंट पर्याय उपलब्ध असल्याने ते फारसे चिंतित नाहीत.
या पेमेंट ॲप्सचा वापर –
सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की जे किरकोळ विक्रेते पेमेंटसाठी इतर ॲप्स वापरत आहेत किंवा वापरण्याचा विचार करत आहेत, त्यापैकी 50 टक्के विक्रेत्यांनी PhonePe. 30 टक्के लोकांनी Google Pay आणि 10 टक्के लोकांनी BharatPe स्वीकारले आहे. त्याचा वापर सुरु केला आहे.
दरम्यान, 31 जानेवारी रोजी, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक (PPBL) वर 1 मार्चपासून त्यांच्या खात्यांमध्ये आणि डिजिटल वॉलेटमध्ये नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली होती. आरबीआयने आपल्या नोटीसमध्ये म्हटले होते की, KYC नियमांचे उल्लंघन केल्यामुळे PPBL विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
One 97 Communications Paytm Ltd. शेअरमध्ये 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत काय हालचाली झाल्या ते पुढील आकेडवारीवरून पहा..
31 जानेवारीला शेअर बाजार व्यवहाराअंती पेटीएमच्या शेअरची किंमत (closing) 761.20 रुपये होती. 1 फेब्रुवारीला 609 रुपये, 2 फेब्रुवारीला 487.20, शनिवार आणि रविवारमुळे दोन दिवस मार्केट बंद. त्यानंतर 5 फेब्रुवारीला 438.50 रुपये, 6 फेब्रुवारी 451.15, 7 फेब्रुवारी 496.25 रुपये. दोन दिवस शेअरची खरेदी झाल्यानंतर पुन्हा आज गुरुवारी 8 फेब्रुवारीला पेटीएमचा शेअर घसरला असून 446.65 रुपयांवर आला आहे.
1 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात पेटीएमचे समभाग 20 टक्क्यांनी कोसळले आणि लोअर सर्किट संपूर्ण दिवस कायम राहिलं. दुसऱ्या दिवशीही हीच स्थिती कायम राहिली. लोअर सर्किट कायम राहिले. पेटीएमच्या शेअर्समध्ये घसरण होत लोअर सर्किट लागल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली. त्यामुळे गुंतवणुकदारांचे नुकसान कमी होण्यासाठी स्टाॅक एक्सचेंजकडून पेटीएमची लोअर सर्किट लिमिट 20 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आली. पुन्हा दोन दिवस वाढीनंतर आज पुन्हा शेअर घसरला आहे.
किती लोक पेटीएमचा वापर करतात –
पेटीएमच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, पेटीएमने भारतात डिजिटल क्रांती सुरू केली आण भारतातील आघाडीचे पेमेंट ॲप बनले. 20 दशलक्षाहून अधिक व्यापारी आणि व्यवसाय डिजिटल पद्धतीने पेमेंट स्वीकारण्यासाठी पेटीएमद्वारे जोडले गेले आहेत.
तर 300 दशलक्षाहून अधिक भारतीय वस्तू खरेदी केल्यास पेमेंट करण्यासाठी पेटीएम वापरतात. तसेच Paytm ॲपचा वापर बिले भरण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी, मित्र आणि कुटुंबीयांना पैसे पाठवण्यासाठी, चित्रपट बुक करण्यासाठी आणि प्रवासाची तिकिटे करण्यासाठी केला जातो. मात्र आरबीआय कारवाईनंतर पेटीएम वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.
आरबीआय कारवाईनंतर पेटीएम संस्थापक विजय शेखर यांची प्रतिक्रिया काय होती –
आरबीआयने (RBI) पेटीएम बँकेवर (Paytm Payments Bank) केलेल्या कारवाईनंतर पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली की, आमचं नेमकं कुठे चुकलं हेच समजत नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम बँकेवर एवढी मोठी कारवाई कशी केली हेच समजत नाही. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत एक मिटिंग घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
विजय शेखर शर्मा यांनी कॉन्फरन्स कॉल दरम्यान बोलताना कर्मचाऱ्यांनी त्यांनी नोकऱ्यांबाबत काळजी करण्याचे काही कारण नाही असा विश्वास दिला. तुम्ही सर्व पेटीएम कुटुंबाचा भाग आहात, कंपनी तुमची काळजी घेईल असं ते म्हणाले. विजय शेखर शर्मा व्यतिरिक्त, पेटीएमचे अध्यक्ष आणि सीओओ भावेश गुप्ता, पेटीएम पेमेंट्स बँकेचे सीईओ सुरिंदर चावला यांच्यासह सुमारे 900 कर्मचारी या कॉलमध्ये सामील होते. मनी कंट्रोलच्या एका वृत्तानुसार, विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, पेटीएम बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी कंपनीने अनेक बँकांशी संपर्क साधला आहे. पेटीएम सर्व नियमांचे पालन करेल.