मुंबई – अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी आज चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी आज मंत्रालयात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर धाव घेतली. पोलिसांनी सतर्क होऊन आंदोलक शेतकऱ्यांना जाळीवरून बाहेर काढले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील 103 दिवसांपासून हे शेतकरी त्यांच्या मागण्या मांडत आहेत मात्र प्रशासनाकडून त्याची कोणताही दखल घेतली जात नाही असे त्यांचे म्हणणे आहे. अप्पर वर्धा प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी या सरकारला दिल्या आहेत. पण त्याबदल्यात शासनाकडून मिळणारी हक्काच्या मोबादल्याची रक्कम अजूनही मिळाली नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली असल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणती भूमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.