इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यात डाळिंब, द्राक्ष उत्पादकांना परदेशी व्यापाऱ्यांचा गंडा
भवानीनगर -इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब आणि द्राक्ष पिकविले जाते. संपूर्ण राज्यात नाहीतर देशाबाहेरही ही या भागातील डाळिंब आणि द्राक्ष जात आहेत. परंतु सध्या या भागामध्ये गंडा घालणाऱ्या परदेशी व्यापाऱ्यांची संख्या काय कमी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवले आणि परदेशी व्यापाऱ्यांनी हिरावले असे म्हणण्याची वेळ इंदापूर तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादकांवर आली आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये उसाच्या पिकाबरोबर फळबागांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या फळबागांमध्ये प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्ष या फळबागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. शेतकरी बॅंकेतून किंवा सोसायटीच्या माध्यमातून कर्ज काढून या फळबागा उभा करीत आहे. या फळबागांना कायमस्वरूपी औषध फवारणी करावी लागत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे स्व-भांडवल असणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्याकडे स्व-भांडवल नसल्यानेच शेतकरी हे कर्ज काढत शेतीसाठी खर्च करत आहेत. शेतामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस राबत आहे.
अतिशय काबाडकष्ट करून या द्राक्षबागा किंवा डाळिंब बागा जपण्याचे काम करत आहेत. परंतु या बागांना फळधारणा झाल्यानंतर ज्यावेळी डाळिंब आणि द्राक्ष पीक विकण्याच्या तयारीत येते त्यावेळी या भागामध्ये बाहेरून काही परदेशी व्यापारी येऊन व याच भागातील स्थानिक शेतकऱ्याला हाताशी धरून मी कशा पद्धतीने चांगला व्यापारी आहे. तुमच्या डाळिंब, द्राक्ष बागेतील पिकाला योग्य ती रक्कम दिली जाईल, अशा पद्धतीने बोलून शेतकऱ्यांना आपल्याबद्दल विश्वास दाखवून हा आलेला व्यापारी योग्यप्रकारे भुरळ घालून या शेतकऱ्यांच्या शेतातील काही प्रमाणात डाळिंब, द्राक्ष नेत असून त्याचे पैसेही आदा करत आहे.
परंतु नंतरचे किंवा दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातील डाळिंब आणि द्राक्ष खरेदी करून ती द्राक्ष बाहेर पाठवले जाते व त्या बदल्यात काही रकमेचा धनादेश दिला जातो. द्राक्ष बाग किंवा डाळिंब बाग गेल्यानंतर शेतकरी हा धनादेश बॅंकेत भरतात. परंतु त्यावेळी हा धनादेश वटला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या हाती निराशा येत आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या बागेमध्ये येऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण अतिशय मोठा डाळिंब किंवा द्राक्षे खरेदी करणारा व्यापारी असल्याचे भासवून शेतकऱ्यांना हे व्यापारी गंडा घालत आहेत.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील डाळिंब किंवा द्राक्ष हा हातातोंडाशी आलेला घास कसा चांगल्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये विक्री करून चार पैसे मिळवता येतील यासाठी बारकाईने विचार करून चांगले व्यापारी असतील त्यांची शहनिशा करूनच आपल्या शेतातील डाळिंब किंवा द्राक्ष विक्री करावी अन्यथा भामटे व्यापारी आढळल्यास ताबडतोब पोलीस ठाण्याची संपर्क साधून अशा व्यापाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
फडवणीस सरकारने बाजार समित्यांच्या आवाराच्या बाहेरच्या कार्य क्षेत्रातील बाजार समितीचे नियंत्रण उठवल आहे. फळे, भाजीपाला हा नियमनमुक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर या अडचणी निर्माण झाल्या आहेत. थेट बांधावर विक्री ही पद्धत पहिल्यापासून होती. परंतु दोन वर्षांपूर्वी फळे, भाजीपाला हे नियमन मुक्त केल्याने ही शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा फसवणूकीच्या प्रकारास सामोरे जावे लागत आहे. व्यापारी फळे खरेदी करत असताना दरांमध्ये फसगत करून लहान – मोठ्या फळांची तुलना करून त्याचा दर वेगवेगळा करत आहेत. निवड प्रक्रिया केली जात आहे. वजनामध्ये फसगत केली जात आहे. हे केवळ फळे व भाजीपाला हे नियमन मुक्त केल्यामुळे होत आहे.
– वैभव दोशी, सचिव, इंदापूर बाजार समिती.
शेतकऱ्यांच्या हाती खोटे धनादेश…
या अगोदर इंदापूर, बारामती, दौंड व तसेच इतर तालुक्यांमध्ये डाळिंब व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना गंडा घातलेला आहे. खोटे धनादेश देऊन सध्या हा भामटा व्यापारी याचा कोणालाही थांगपत्ता लागणार नाही अशा ठिकाणी गायब झालेला आहे. त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु हा भामटा व्यापारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला नाही. यावरून शेतकऱ्यांनी आतातरी सावध होऊन चार पैसे कमी आले तरी जो व्यापारी शेतकऱ्यांच्या ओळखीचा व विश्वासातील असेल, व्यापारी न फसवता वेळेवर डाळिंबाचे पैसे देऊ शकेल अशाच व्यापाऱ्याला डाळिंबाची विक्री केली पाहिजे.