चव्हाणमळा येथील कामांचा दर्जा सुमार : सुविधांचा बोजवारा
राजगुरुनगर : नव्याने राष्ट्रीय महामार्ग झालेल्या शिरूर-राजगुरूनगर- भीमाशंकर मार्गावर चव्हाणमळा येथे सांडपाणी व पावसाचे पाणी जाण्यासाठीचे मार्ग बंद केल्याने व रस्ता करतेसमयी सुविधा केल्या नसल्याने पाणी साचून वळण रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत.
शिरूर-राजगुरूनगर- भीमाशंकर राज्यमार्गाचे नुकतेच राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. सेझमध्ये खेड सिटी झाल्यानंतर सहा वर्षापूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण होऊन डांबरीकरण झाले आहे. राजगुरूनगरजवळ चव्हाणमळा या ठिकाणी वळणावर असलेल्या नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद केला. मोरी व गटार न केल्याने पावसाचे सर्व पाणी रस्त्यात साचते.
या ठिकाणी रस्त्याबाहेरच्या दोन्ही बाजू उंच केल्याने मध्ये पाणी साचते. साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हे पाणी डांबरी रस्त्यात मुरते. कंटेनर,हाईवासारखी जड वाहने जात असल्याने डांबरी रस्ता उखडून त्यात मोठी डबकी झाली आहेत. शिरूर- भीमाशंकर राष्ट्रीय महामर्गवरील खेड ते कनेरसर हा रस्त्याचे पूर्व भागात सेझ प्रकल्प आल्याने रंदीकरण करून प्रशस्त करण्यात आला.
अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक राजगुरुनगर येथे पायी ये-जा करतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सांडपाणी बंद करुन रस्ता खडी टाकून उंच करून कॉंक्रीटीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.