मुंबई: राज्यात अवकाळी पाऊस, महापूर, परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यातील सद्यस्थिती त्यांच्या निदर्शणास आणली. शेतकऱ्यांच्या पिकाच्या व मालाच्या झालेल्या नुकसानाबाबात शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती राज्यपालांना यावेळी करण्यात आली.
सरकारने परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, शेतकऱ्यांचे पीक कर्ज व वीज बिल माफ करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत करावी. द्राक्ष बागांसह फळबागांचे व भाजीपाल्याचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत द्यावी, पशूधन व घरांची पडझड झाली आहे त्याचे पंचनामे तात्काळ करून मदत करावी, रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतं मोफत द्यावीत अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी राज्यपालांना सादर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.
तसेच राज्यातील ७५० किलोमीटरच्या सागरी किनारपट्ट्यातील मच्छिमारांचेही नुकसान झाल्याने त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबतही राज्यपालांनी आवश्यक त्या सूचना सरकारला कराव्यात, अशी विनंती राज्यापालांना करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीदेखील पत्रकारांशी संवाद साधला. मागे खासगी कंपन्यांनी विम्याची नफेखोरी केली होती. मात्र यावेळी सरकारने ती मदत मिळवून दिली पाहिजे, असे थोरात म्हणाले. मागील पूर परिस्थितीत ६८०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा झाली ती मदत अद्याप मिळालेली नाही. आता यावेळी जाहीर केलेली दहा हजार कोटींची मदत कधी मिळणार? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.
Ajit Pawar, NCP after delegation of NCP&Congress met #Maharashtra Governor: Discussion was held on the losses caused to farmers due to unseasonal rains. Financial assistance announced by govt for Sangli&Kolhapur has not reached farmers yet,so we asked for help to all farmers. pic.twitter.com/zpTs8D7MbY
— ANI (@ANI) November 5, 2019