रात्रीच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले ः वारसोळा ग्रामस्थांची गैरसोय
अवसरी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने स्मशानभूमी ते वारसोळा हा डांबरी रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. वारसोळा ग्रामस्थांना या वाहून गेलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने हा वाहून गेलेला रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अवसरी खुर्द स्मशानभूमी ते वारसोळा या सुमारे दोन किमी रस्ता माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या निधीतून तीस लाख रुपये खर्च करून नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. या डांबरीकरण केलेल्या वारसोळा, इंदोरेवाडी, गुरववस्ती तसेच श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान मंदिर याकडे जाणारे ग्रामस्थ, भाविक या रस्त्याचा वापर करीत असे. या रस्त्यावरून दूध वाहतूक, जनावरांचा चारा वाहतूक, शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच खंडोबा मंदिराकडे जाणारे भाविक या रस्त्याचा वापर करीत असतात.
अनेक दिवसांपासून या भागातील वस्तीवरील नागरिकांची या रस्त्याच्या डांबरीकरण करण्याची मागणी दिलीप वळसे पाटील यांचे कडे केली होती. त्यांचे मागणी नुसार नुकताच हा रस्ता डांबरीकरण पूर्ण झाले होते; परंतु निसर्गाच्या प्रकोपामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेल्याने रस्त्याचे आतील भागातील खडी मोठ्या प्रमाणावर उघडी पडली आहे. तसेच रस्ता काही ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने खचला असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य संतोष भोर यांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्याच्या रस्तादुरवस्थेने शासनाचे आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने खराब झालेला रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.