केंदूर -चासकमान धरणाचे पाणी गेल्या दोन आठवड्यापासून मागणी करत असूनही मिळत नसल्याने जातेगाव खुर्द, करंदी आणि पिंपळे जगतापच्या शेतकऱ्यांनी चक्रीउपोषण सुरू केले आहे
चासकमान प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असलेली भावना व्यक्त करत जातेगाव खुर्दच्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन कालव्याच्या बाजूला बसून उपोषण सुरू केले आहे. आमच्या हक्काचं पाणी असून देखील आम्हाला पाणी मिळत नाही आमची पिके जळून चालली आहे.
येत्या दोन दिवसांत पाणी मिळाले नाही तर आमच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे जोपर्यंत आम्हाला पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सोशल डिस्टन्स पाळून शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.
आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही याचं कारण फक्त आमदार आणि खासदार यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
सायंकाळी उशीर शाखा अभियंता महेंद्र गायकवाड यांनी शेतकऱ्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली. मात्र शेतकरी पाणी मिळेपर्यंत उपोषण थांबवणार नाही असा पवित्रा घेतला आहे. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे यांनी देखील दुरध्वनीवरून उपोषकर्त्यांशी संपर्क करून उपोषण थांबवण्याची विनंती केली मात्र शेतकरी मागणीवर ठाम आहेत.