गंगाखेड – भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात विविध ठिकाणी पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस येत आहे तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. अशातच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील उखळी खुर्द गावातील शेतशिवारात वीज कोसळून शेतकऱ्याचा आणि शेती कामासाठी असलेल्या सालगड्याचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीघे जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारच्या सुमारास घडली.
बालासाहेब बाबुराव फड (वय 50) सालगडी परसराम नागरगोजे (वय 40) अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत. तर राहीबाई बाबुराव फड (वय 70), सतीश सखाराम नरवाडे (वय 35), राजेभाऊ किशन नरवाडे (वय 40) हे जखमी झाले आहेत. हे सर्व शेतात काम करत असताना पाऊस आल्याने बाभळीच्या झाडाखाली आडोश्याला थांबले होते.
तेवढ्यात वीजांचा कडकडाट सुरु झाला आणि वीज नेमकी बाभळीवर पडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण तालुका हळहळला आहे. घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आणखी दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी झाडाखाली आडोशाला थांबू नये असे आवाहनही करण्यात येत आहे. झाडांवर वीज कोसळण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वीजांचा कडकडाट सुरु असताना झाडांचा आसरा घेणे चुकिचे ठरते असे सांगण्यात येत आहे.