कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण
रेडा-सध्या इंदापूर तालुक्यामध्ये सिंचनाच्या पाण्याचा भरमसाठ साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, मका व कांदा अशी पिके आपल्या शेतात घेतली आहेत. थंडीचे दिवस असल्यामुळे दिवसभर शेतकरी शेतात राबराब राबतो आहे. मात्र महावितरण कंपनीकडून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे हाता तोंडाला आलेली ही पिके वेळेवर पाणी मिळत नसल्याने कोमेजून जात आहेत. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांची मुस्कटदाबी मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे.
इंदापूर तालुक्यात मागील पंधरा वर्षापासून पहिल्यांदाच पेरा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे, जणूकाही सिंचनाची स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये चाललेली दिसत आहे. मात्र या स्पर्धेला अडथळा ठरतो आहे तो महावितरण कंपनीचा,वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची दरमहा बैठक रब्बी व इतर हंगामामध्ये तालुक्याच्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. सध्या विजेविना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे.
बावडा, नरसिंहपूर, भोडणी, बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, निमसाखर, सराफवाडी या भागातील वीज पुरवठा करणारे रोहित्र मोठ्या संख्येने जीर्ण झाली आहेत. त्यामुळे विज कधी जाईल याचा भरवसा शेतकऱ्याला नसतो. वीज वितरण कंपनीने तालुक्यातील सर्व गावांच्या हद्दीतील वीज वितरण कंपनीचे जीर्ण तारा तसेच खांब बदलून वीज पुरवठा सुस्थितीत करणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. काटी वीज वितरण कार्यालयामार्फत शेतकरी व ग्राहकांना विजेची अडचण तसेच तक्रारी कार्यालयापर्यंत पोहोचताच सुटतात. मात्र उजनी बॅक वॉटर पट्ट्यातील गावांमध्ये खासगी वायरमनला अधिकचे पैसे मोजून झालेले बिघाड दुरुस्त करावे लागतात.
- एक नव्हे अनेक समस्या-
इंदापूर तालुका हा खेड्या गाव गावांचा तालुका म्हणून परिचित आहे. जवळपास 140 च्या वरती ग्रामीण भागात गावे आहेत तर वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लोकसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे विजेचा वापर वाढत आहे. जुन्या रोहित्रावर ताण येतो व त्यामुळे वीजपुरवठा सातत्याने खंडित होतो. त्यामुळे अनेक वेळा हे रोहित्र जागीच जळतात. मात्र संबंधित कार्यालयाकडे दुरुस्तीसाठी मागणी केल्यास रोहित्रासाठी आवश्यक साहित्य दिले जात नाही. साहित्य तुम्ही आणा व बसवून घ्या, असे उत्तर वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांकडून मिळते त्यामुळे एक नव्हे अनेक समस्या इंदापूर तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या आहेत. - अशा शेतकयांनी आमच्याशी संपर्क साधावा-
ज्या भागात कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्या शेतकऱ्यांनी महावितरण विभागाशी संपर्क साधावा. इंदापूर तालुक्यातील ज्या गावांमध्ये कमी दाबाने शेतकऱ्यांना वीज पुरवठा होतो. अशा शेतकऱ्यांच्या समस्या त्वरीत सोडवल्या जातील. अशी माहीती वीज वितरण कंपनीच्या इंदापूर तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.