पुणे : वडिलोपार्जित संपत्तीवरून बहिण-भावांमध्ये दहा वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये भावाने एका बहिणीला 11 गुंठे, तर दुसऱ्या मयत बहिणीच्या दोन्ही मुलींना 5 गुंठे जमीन देण्याचे मान्य केले. दिवाणी न्यायाधीश व्ही.एम.कराडकर यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.
वडिलांच्या निधनानंतर फुरसंगी येथील वडिलोपार्जित जमिनित वाटा मिळावा, म्हणून बाळाबाई ऊर्फ पारूबाई बबन काळभोर यांनी ऍड. शिवाजीराव देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली होती. बाळाबाई यांच्या एका बहिणीचा मृत्यू झाला आहे. मयत बहिणीच्या मुली प्रियांका योगेश गायकवाड आणि शितल राहुल कटके याही वादी होत्या.
त्यांच्या वतीने ऍड. के.के.गवारे आणि ऍड. खंडेराव टाचले यांनी बाजू मांडली. रामभाऊ दौलता कामठे हे प्रतिवादी असून, त्यांच्या वतीने ऍड. यतिन येवले यांनी बाजू मांडली. जमिनीवरून त्यांच्या चकरा मागील दहा वर्षांपासून कोर्टात सुरू होता. त्यानंतर 2017 मध्ये याबाबत ऍड. शिवाजीराव देशमुख यांच्यामार्फत काळभोर यांनी भावाविरुद्ध दावा दाखल केला होता.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये त्यांच्यात तडजोड झाली. त्यांना त्यांचा हिस्सा मिळाला मिळाल्यामुळे भावा-बहिणीचे नाते पुन्हा नव्याने निर्माण झाल्याचा आनंद बाळाबाई काळभोर यांनी व्यक्त केला. तर, बहिणीला जमिन दिल्याचा आनंद वाटत असल्याचे भाऊ रामभाऊ कामठे यांनी सांगितले.
बहिणीला समान हिस्सा का नाही ?
सर्वोच्च न्यायालयाने सन 2016 प्रकाश वि. फुलवतीच्या प्रकरणात निर्णय दिला आहे. त्यानुसार बहिण-भावांच्या वादांच्या प्रकरणात वडिलोपार्जित मिळकतीच्या बाबतीत 9 सप्टेंबर 2005 रोजी वडिल हयात असले पाहिजेत.
वडिलोपार्जित मिळकत असल्यानंतर. मुलीला समान हिस्सा मिळतो. मात्र, 2005 च्या आगोदर वडिलांचा मृत्यू झाला असेल, हा कायदा लागू होत नाही. या प्रकरणात वडिलांचा सुमारे 30 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे.